फरीदा खातून असं हत्या झालेल्या २३ वर्षीय महिलेचं नाव असून ती मूळची उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. ती आणि तिचा 34 वर्षीय पती जिया ऊल हक उदगीर जवळील विलास साखर कारखाना परिसरात कामगार म्हणून काम करीत होते. मूळचे उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील हे दोघे आपल्या दोन मुलांसह राहत होते. मात्र पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून आरोपी पती जिया उल हक ने आपल्या चार साथीदाराच्या मदतीने फरीदाच्या छातीवर बसून, तोंडावर उशी दाबून खून केला.
advertisement
त्यानंतर फरीदाचा मृतदेह एका ट्रॉली बॅगेत ठेवून उदगीर तालुक्यातील तिरु नदीच्या पुलाजवळ फेकून दिला होता. पत्नी फरीदा हिचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने त्यांच्यात नेहमी भांडणं होत होते. फरीदा ही काही दिवसापूर्वीच मुलांसह जिया उल हक याच्याकडे राहण्यास आली होती. साखर कारखान्याने दिलेल्या एका खोलीत हे कुटुंब राहत होतं. चारित्र्यावरील संशयावरून पती जिया उल हकने साथीदारासोबत मिळून फरीदाच्या हत्येचा कट रचला.
15 ऑगस्ट रोजी साखर कारखान्यातील कामगारांची सुट्टी असल्याने जिया उल हक याने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरी असताना आपले उत्तर प्रदेशातील साथीदार सज्जाद जरूल अन्सारी (वय 19 वर्ष), अरबाज जमलू अन्सारी (वय 19 वर्ष), साकीर इब्राहिम अन्सारी (वय 24 वर्ष), आजम अली सजवाल अली उर्फ गुड्डू (वय 19 वर्ष) यांना बोलावून घेतलं आणि सर्वांनी मिळून फरीदाचा खून केला. विशेष म्हणजे पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी जिया उल हक याने पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. याप्रकरणी लातूर पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कसून तपास करून या गुन्ह्याचा उलगडा केला. याप्रकरणी आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.