जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एकलग्न गावातील मच्छिंद्र गायकवाड हा तरुण मद्यधुंद दारूच्या नशेत आज सकाळीच पाळधी सोनवद रेल्वे गेट याठिकाणी पोहचला. रेल्वे गेटमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा तरुण या ठिकाणी आत्महत्या करण्यासाठी आला होता. दारूच्या नशेत असल्यानं याठिकाणी असलेल्या गेटमनला शंका आली. हा तरुण आत्महत्या करण्यासाठी आला असावा म्हणून गेटमनने तरुणाला हटकले पण हा तरुण जायचे नाव घेत नव्हता. त्याचवेळी एक सुपरफास्ट रेल्वे गेली. तरुणाला थांबवले नसते तर तो जीव देण्यासाठी गेला असता. सुदैवाने गेटमनच्या समय सुचकतेमुळे त्याचे पहिल्यांदा प्राण वाचले. त्यानंतर हा तरुण काही वेळ तिथून निघून गेला.
advertisement
त्यानंतर पुन्हा मालगाडी येत असल्याचं पाहून रेल्वे गेटजवळ येत तरुण रेल्वे रुळाच्या मधोमध झोपून राहिला. यावेळी त्याला उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो उठला नाही. मालवाहू गाडी वेगात असल्यानं तरुणाच्या अंगावरून तीन मालवाहू डब्बे गेले त्यानंतर गाडी थांबवून पुन्हा या तरुणाला बघितले असता सुदैवानं तरुण जिवंत होता. विशेष म्हणजे त्याला कुठलीही दुखापत झालेली नव्हती. त्यानंतर तरुणाला तिथून उचलून बाजूला नेण्यात आलं.
गेटमन सुनील आर इसे यांनी दाखवलेल्या समय सुचकतेचे तसेच सतर्कतेचे परिसरात कौतुक होत आहे. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी सुद्धा झाली होती. नागरिकांनी संबंधित तरुणाला चांगलेच झापले, मात्र तरुणाने जमिनीवर झोपून गोंधळ घातला. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून घटनेची मोठी चर्चा रंगली आहे.
