जालना : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं असतं. मात्र, विद्यार्थ्यांचा पायाच कच्चा राहिला तर भविष्यातील स्पर्धेच्या युगात ते तग धरू शकत नाहीत. आपल्या देशात सरकारी शाळांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
जालना जिल्ह्यातील मजरेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना चक्क उघड्यावर शिक्षणाचे धडे घेण्याची वेळ आली आहे. या शाळेतील तब्बल 9 वर्ग खोल्यावर चक्क अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण केलं आहे आहे आणि वर्ग खोल्यांमध्ये थेट संसार थाटला आहे.
advertisement
काय आहे नेमकी घटना -
जालना जिल्ह्यातील मजरेवाडी हे छोटसं गाव. या गावात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शाळा आहे. मराठी आणि उर्दू अशा दोन्ही माध्यमांचे मिळून एकूण 300 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. एप्रिल महिन्यात न्यायालयाच्या आदेशाने मजरेवाडीतील गावठाण जमिनीवर झालेलं अतिक्रमण हटविण्यात आले. यामुळे इथे राहत असलेल्या नागरिकांच्या निवाऱ्याचा प्रश्न उपलब्ध झाला.
शाळेला उन्हाळी सुट्ट्या असल्याने प्रशासनाने काही दिवसांसाठी शाळेत या बेघरांना आसरा देण्यास सांगितले. मात्र, उन्हाळी सुट्ट्या उलटून गेल्या आणि शाळा सुरू होऊन 20 दिवस झाले तरी अतिक्रमणधारकांनी शाळेच्या वर्ग खोल्या खाली केलेल्या नाहीत. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना ऊन, वारा आणि पाऊस सहन करत उघड्यावरच शिक्षणाचे धडे गिरवण्याची वेळ आली आहे.
मुख्याध्यापक काय म्हणाले -
विद्यार्थ्यांना शिकवताना आम्हाला अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी बोर्डची व्यवस्था नाही. त्याचबरोबर पावसाची भीती असल्याने शाळेचा वेळही कमी करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या वर्ग खोल्या मिळाव्यात यासाठी आम्ही तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना देखील निवेदन दिले आहे. अतिक्रमणधारकांना 2 ते 3 दिवसात वर्ग खोल्या खाली करण्याचे देखील सांगण्यात आले आहे. मात्र, ते वर्ग खोल्या खाली करत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या मैदानातच शिकवावे लागत आहे. विद्यार्थ्यांना त्यांची हक्काची शाळा मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया शाळेचे मुख्याध्यापक शेख तालीब यांनी दिली.
भयावह घाट…, म्हणे, गाडीसमोर येतात भूतं; अनेकांना आला जीवघेणा अनुभव, कुठे आहे हे ठिकाण?
विद्यार्थी काय म्हणाले -
आम्हाला इथे बसायला अडचण होते. खूप गरमही होते. या सर्व परिस्थितीत आमचं शिक्षण नीट होत नाही. आम्हाला शिकवण्यासाठी इथे फळ्याची व्यवस्था नाही. त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला आमच्या वर्ग खोल्या मिळाव्यात अशी अपेक्षा विद्यार्थिनी सुमय्या युसुफ चौधरी हिने व्यक्त केली.