जालना : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अतिशय महत्त्वपूर्ण असलेली योजना. निवडणूक संपल्यानंतरही या योजनेची महिलांमध्ये असलेली लोकप्रियता कायम आहे. या योजनेमुळेच महायुतीला राज्यात प्रचंड यश मिळाल्याचे सांगितलं जातं. याच योजनेची पैसे अनेकांनी गैरप्रकार करून लाटण्याची प्रकार देखील आता हळूहळू समोर येत आहेत. जालना जिल्ह्यातील एका प्रकाराने देखील जिल्ह्यात खळबळ उडून दिली आहे. जालना जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे चक्क लाडक्या भावाला मिळालेत. त्यानंतर त्यांनी हे पैसे परत केले आहेत.
advertisement
जालना जिल्ह्यातील सोमनाथ जळगाव येथील रहिवासी असलेले विलास भुतेकर यांच्या खात्यावर साडेसात हजार रुपये जमा झाल्याचा संदेश त्यांना 5 डिसेंबर रोजी आला. खात्यावर आलेले पैसे कशाचे आहेत याची चौकशी त्यांनी बँकेमध्ये केली तेव्हा हे पैसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. योजनेचा फॉर्म भरत असताना झालेल्या चुकीमुळे त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या अशा दोघांच्याही खात्यात पैसे आल्याची बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी या योजनेचे अशासकीय सदस्य असलेले मानेगाव येथील सरपंच संतोष डेंगळे यांच्या कानावर ही बाब घातली.
निराधारासाठी कुडाळ येथील सविता आश्रम ठरतोय एक आधार, दीड हजार नागरिकांचे यशस्वीरित्या पुनर्वसन
प्रशासनाशी चर्चा करून हे पैसे परत करण्याची इच्छा भुतेकर यांनी व्यक्त केली. अशासकीय सदस्य संतोष डेंगळे यांनी देखील या कामी त्यांना मदत केली. दिनांक 10 डिसेंबर रोजी विलास भुतेकर यांनी हे पैसे शासकीय निधीमध्ये जमा केले आहेत. मात्र असे असंख्य प्रकार जिल्ह्यात आणि राज्यात घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने या सर्व गैरप्रकारांची चौकशी करून दोषी आढळलेल्या व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.
योजनेचा फॉर्म भरत असताना माझ्या पत्नी ऐवजी माझे आधार कार्ड जोडण्यात आले ते आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असल्यामुळे योजनेची पैसे माझ्या खात्यामध्ये आले. ही चूक नंतर लक्षात आल्यामुळे पत्नीचाही आम्ही स्वतंत्र फॉर्म भरला आणि त्या खात्यामध्ये ही पैसे जमा झाले. त्यामुळे माझ्या खात्यात जमा झालेले पैसे परत करण्यासाठी मी अशासकीय सदस्य सरपंच संतोष ढेंगळे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी प्रशासनाशी संपर्क करून पैसे परत घेण्याची प्रक्रिया पार पाडली, असं विलास भुतेकर यांनी सांगितलं.





