सरकारी नोकरी हवी असलेल्या तरुणांना लक्ष्य करून ठगबाज टोळीने लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. एवढंच नाही, तर या टोळीने मंत्रालयात बनावट अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुलाखती घेऊनच तरुणांना भुलवलं. मंत्रालयासारख्या कडेकोट सुरक्षेच्या ठिकाणी ही फसवणूक घडल्यामुळे प्रशासनाच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिलं आहे.
मंत्रालयात घेतल्या मुलाखती
नागपूरच्या राहुल तायडे यांची 2019 साली लॉरेन्स हेनरी नावाच्या ठकबाजाशी ओळख झाली. लॉरेन्स, त्याची पत्नी शिल्पा आणि इतर साथीदारांनी त्यांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवत तब्बल 9 लाख 50 हजार रुपयांनी फसवलं. कनिष्ठ लिपिक पदासाठी मंत्रालयातच खोटी मुलाखत घेण्यात आली. खोट्या आयडी कार्ड्सचा वापर करून मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या वेशात आरोपींनी तायडेंची मुलाखत घेतली. एवढंच नव्हे तर मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.
advertisement
आतापर्यंत 1 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक
2019 ते 2022 दरम्यान टोळीने केवळ राहुलच नव्हे तर अनेक तरुणांना अशाच पद्धतीने गंडवले. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने लॉरेन्स हेनरीला मुंबईतून अटक केली असून त्याची पत्नी शिल्पा आणि आणखी दोन आरोपी फरार आहेत. आतापर्यंतच्या तपासात तब्बल 1 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे. मात्र ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
राज्यभरातील तरुणांना सरकारी नोकरीच्या आमिषाने फसवलं
2019 मध्ये पैसे घेऊनही जॉइनिंग लेटर न दिल्यामुळे अखेर राहुल तायडे यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने मागील आठवड्यात हेनरीला अटक केली. या टोळीने केवळ नागपूरच नव्हे तर राज्यभरातील तरुणांना सरकारी नोकरीच्या आमिषाने फसवल्याचंही समोर आलं आहे.
हे ही वाचा: