कागल तालुक्यातील शेंडूर इथ असलेल्या दिपाली गुरुनाथ कांबळे आणि भाचा अथर्व यांना घेऊन फटाके खरेदी केल्यानंतर श्रीकांत बाबासाहेब कांबळे हे राधानगरी तालुक्यातील तरसंबळे या गावी दुपारी निघाले होते. यावेळी राँग साईडने आलेल्या ट्रकची जोरदार धडक त्यांना बसली. यात दुचाकीवरील श्रीकांत आणि दोन वर्षाची कौशिकी सचिन कांबळे (पुतणी) हे जागीच ठार झाले तर बहीण दिपाली हिचा रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेत मृत्यू झाला. ऐन दिवाळीत झालेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
श्रीकांत बाबासाहेब कांबळे (वय ३०) व कौशिकी सचिन कांबळे (वय २) हे जागीच ठार तर उपचारासाठी नेत असताना दीपाली गुरुनाथ कांबळे (वय ३१) वाटेत मृत्यू पावली. तर अथर्व गुरुनाथ कांबळे (वय ८) हा बालक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
फटाके खरेदीसाठी निघाले होते
कोल्हापूर राधानगरी राज्यमार्गावर कौलव येथील बुवांचे पूल या ठिकाणी मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता भीषण होती. तरसंबळे या गावातील श्रीकांत बाबासाहेब कांबळे आणि त्यांची बहीण दीपाली गुरुनाथ कांबळे, यांच्यासह घरातील कौशिकी सचिन कांबळे, अथर्व गुरुनाथ कांबळे असे चौघेजण दुचाकी घेऊन भोगावती बाजारपेठेत खरेदीसाठी गेले होते. बाजार घेऊन गावी जात असताना कौलव गावाजवळ आयशर टेम्पो एम एच १४ डी एम ९८३६ आणि मोटारसायकल एम एच ०९सी वाय ४४६५ यांच्यात जोराची धडक झाली.
चिमुरडीच्या डोक्याची कवटी फुटून छिन्नविच्छिन्न अवस्थेत
आयशर टेम्पो राधानगरहून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने निघाला होता. कौलव गावाजवळ राज्यमार्गावर भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की लहान बालिका कौशिकी कांबळे हिची डोक्याची कवटी फुटून छिन्नविच्छिन्न अवस्थेत शरीराचे अवयव आणि मेंदू रस्त्यावर पडला. अपघात स्थळी दोघे जागीच ठार झाले तर उपचारासाठी नेत असताना वाटेत दीपाली गुरुनाथ कांबळे या ठार झाल्या.
ऐन दिवाळीत अपघात, नातेवाईकांचा काळीज चिरणारा आक्रोश
जखमी अथर्व हा बालक गंभीर असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. कोल्हापूर येथील सी पी आर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. ऐन दिवाळीत अपघात पाहून नागरिकांडून हळहळ व्यक्त केली जात होती. अपघात स्थळी नातेवाईकांचा आक्रोश हृदय हेलवणारा होता.
पंधरा दिवसांपूर्वी मयत श्रीकांत कांबळे या इंजिनिअरची लहान मुलगी मयत झाली होती. पहिले दुःख विसरण्यापूर्वीच श्रीकांत कांबळे, बहीण दीपाली कांबळे तर भावाची मुलगी कौशकी कांबळे असे तिघेजण मयत झाले आहेत. अपघात स्थळी प्रचंड गर्दी होती. संतप्त नागरिकांनी अपघाताला कारणीभूत असलेल्या टेम्पोवर दगड मारून नुकसान केले. पोलीस यंत्रणा अपघातस्थळी दीड तासांनंतर आल्याने संतप्त प्रतिक्रिया ऐकण्यास मिळत होत्या.