जवळपास 22 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजाची मिरवणूक वाजतगाजत गुलाल उधळत गिरगाव चौपाटीवर दाखल झाली. बाप्पााच्या निरोपाची तयारी सगळी पूर्ण झाली. मात्र, भरतीच्या बदललेल्या वेळेमुळे विसर्जनाचे गणित बिघडले. आज सकाळी लालबागचा राजा चौपाटीवर दाखल झाल्यावेळी भरतीचे पाणी वेगाने वाढत होते. मूर्ती समुद्रकिनाऱ्यावर आणल्यानंतर विसर्जनासाठी सजवलेला तराफा आणि मूर्ती ठेवलेला पाट यांची भरतीच्या उंच लाटांमुळे जुळवणी होत नव्हती. भरतीचे पाणी इतके वाढले की मूर्तीचा पाट समुद्रात तरंगू लागला.
advertisement
या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोळी बांधव गेल्या दीड तासांपासून आटोकाट प्रयत्न करत आहेत. त्यांनी दोन्ही बाजूंनी पाट आणि तराफा स्थिर करण्याचा प्रयत्न केला, मात्र भरतीच्या प्रचंड वेगवान लाटा त्यात अडथळा ठरत आहेत. परिणामी विसर्जनाची प्रक्रिया थांबवून भरतीचे पाणी आटण्याची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
चार तास खोळंबा...
लालबागचा राजा चार तास समुद्र किनाऱ्यावर थांबला होता. ओहोटीला सुरुवात झाल्यानंतर कोळी बांधवांकडून बाप्पाची मूर्ती तराफावर घेण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. मात्र, दुपारी 1.30 वाजेपर्यंतही भरती ओसरली नव्हती. त्यामुळे विसर्जनाला आणखी वेळ लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. समुद्राची भरती आणखी ओसरली की पुन्हा एकदा विसर्जनाची तयारी करण्यात येणार आहे. समुद्राची भरती आणि लाटा यामुळे विसर्जनाला अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे आता समुद्राच्या लाटा शांत झाल्या की विसर्जनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.