शिवाजी वाल्मिक मेळ्ळे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव असून, शनिवारी (१३ सप्टेंबर) संध्याकाळी त्याने विजेच्या धक्का लावून घेत आपलं जीवन संपवलं आहे. आपल्या मुलांसाठी ‘महादेव कोळी’ जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने आणि त्यामुळे त्यांना शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याच्या मानसिक तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
शिवाजी मेळ्ळे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात आपल्या व्यथा मांडल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की, “माझी दोन लेकरं शिकायला आहेत… मी मजुरी करून घर चालवतो… लेकराला महादेव कोळ्याचं प्रमाणपत्र मिळत नाही… हे सरकार प्रमाणपत्र देत नाही… म्हणून मी करंटला धरून जीवन संपवतोय.”
गेल्या वर्षभरापासून शिवाजी मेळ्ळे मुलांसाठी महादेव कोळी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करत होते. मात्र, अर्ज प्रलंबित असल्याने त्यांना प्रमाणपत्र मिळत नव्हते. त्यामुळे मुलांना शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक सुविधा मिळत नव्हत्या. या आर्थिक आणि मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या आत्महत्येमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, स्थानिकांनी शासनाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
या घटनेमुळे कोळी महादेव समाजाच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून मल्हार कोळी आणि महादेव कोळी समाजाला उर्वरित महाराष्ट्रात लागू असलेले निकष लावून जात प्रमाणपत्र देण्याची मागणी जोर धरत आहे. त्यासाठी विविध आंदोलनेही सुरू आहेत. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडाभर आंदोलनाची हाक देण्यात आली असतानाच ही घटना घडल्याने या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.