25 वर्षांपूर्वी दरोड्या प्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच प्रकरणाचा आता न्यायाधीश एच.ए.एस. मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली 15 ऑक्टोबर रोजी निकाल लागला आहे. न्यायालयाकडे असलेल्या सबळ पुराव्यांनुसार, वसई परिसरातील माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांच्या एका गस्ती पथकाने एप्रिल 2000 मध्ये पाच ते सहा जण दरोड्याच्या योजना आखत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर एक टेम्पो रोखला होता. पोलिसांना टेम्पो पकडण्यात यश आलं पण त्यातील लोकांना पकडण्यात अपयश आलं.
advertisement
पोलिसांच्या गस्त पथकाने सुनील उर्फ कन्हैया सखाराम अग्रवाल नावाच्या एका व्यक्तीला अटक केली होती. तर गाडीतील इतर लोकं पळून जाण्यात यशस्वी झाले होते. सरकारी वकिलांनी न्यायालयामध्ये दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या गस्त पथकाने टेम्पोमधून चाकू, काही रोख रक्कम आणि इतर उपकरणे जप्त केली होती. सरकारी वकिलांनी सुनील उर्फ कन्हैया सखाराम अग्रवाल, नादसिंग नगरसिंग (ज्याचा मृत्यू झाला आहे), मंदिरसिंग नगरसिंगसह इतर आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
एका सुनावणी दरम्यान, न्यायालयाने नमूद केले होते की सर्व प्रयत्न करूनही, दोन जण बेपत्ता आहेत. नादसिंगच्या मृत्यूनंतर त्याच्याविरुद्धचा खटला रद्द करण्यात आला, ज्यामुळे फक्त अग्रवाल आणि मंदिरसिंग यांच्यावरच खटला चालत होता. न्यायाधीश एच.ए.एस. मुल्ला यांनी कोर्टामध्ये नमूद केले की, "सरकारी वकिलांकडे असलेल्या सबळ पुराव्यांनुसार आरोपींचा दरोडा टाकण्याचा हेतू नव्हता. आणखी सबळ पुराव्यांची आवश्यकता आहे. पण ते उपलब्ध होत नाहीत. आरोपी सशस्त्र असल्याने, त्यांचा दरोडा टाकण्याचा हेतू होता, असा निष्कर्ष काढता येत नाही." तब्बल 25 वर्षांनंतर पालघर जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपींना निर्दोष घोषित केल्यामुळे या केसची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
