अजित पवार संतापले...
शरद पवारांवरील टीकेमुळे राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या टीकेच्या पातळीचा मुद्दा ऐरणीवर आला. आज सकाळी पुण्यात बोलताना अजित पवार यांनी सदाभाऊ खोत यांच्या टीकेचा समाचार घेतला. अजित पवारांनी म्हटले की, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकाण कसं करायचं असतं, सुसंस्कृतपणे कसं बोलायचं असतं, कंबरेखालचे वार कसे करायचे नसतात, याचे उदाहरण घालून दिलेले आहे. काही आरोप-प्रत्यारोप होत असतात. परंतु ते मांडण्याची एक पद्धत असते. तेच आपल्याला त्यांनी शिकवलेलं आहे.
advertisement
अजितदादांनी सुनावले...
अजित पवार यांनी म्हटले की, मी तीव्र शब्दात खोत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्याच ट्विट ही केलं आहे. त्यांना फोन करूनही सांगितले आहे. तुम्ही केलेले हे स्टेटमेंट आम्हाला कुणालाही आवडले नाही, तुम्ही हे बंद करा वैयक्तिक कुणाच्या विषयी बोलणं आपल्याच पद्धत नाही, त्याबद्दल मी फोनवरच सदाभाऊंचा निषेध केला असल्याचे अजित पवारांनी सांगितले.
अजित पवारांनी पुढे म्हटले की, तुम्हाला जी भूमिका मांडायची आहे ती मांडा. तुमची विचारधारा इतरांची विचारधारा वेगळी असू शकते, मतमतांतर असू शकते. मात्र, ताळमेळ ठेवून बोललं पाहिजे. हा निंदनीय प्रकार असून विनाशकाली विपरीत बुद्धी सारखा प्रकार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. असली वक्तव्ये महाराष्ट्र खपवून घेत नसल्याचेही अजित पवारांनी म्हटले.
सदाभाऊ खोत यांच्याकडून दिलगिरी व्यक्त...
भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही यावरून सदाभाऊ खोत यांना सुनावलं. आता या प्रकरणी सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. शरद पवार यांच्याबद्दल बोलताना माझ्या भाषेमुळे कुणाच्या भावना दुखाववल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.