जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसणार होते, पण आता जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण पुढे ढकललं आहे. सरकारने उपोषणाची परवानगी नाकारली आहे, आचारसंहिता चालू असल्याने आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली आहे, त्यामुळे जरांगे पाटील यांनी आंदोलनाची तारीख पुढे ढकलली आहे. जरांगे पाटील यांचं आंदोलन आता 4 दिवसांनंतर म्हणजेच 8 जूनपासून सुरू होणार आहे.
advertisement
काय म्हणाले जरांगे पाटील?
'आंदोलनाला परवानगीची गरज नाही, तरीही आपण वेळोवेळी पत्र दिलेलं आहे. परवानगी आम्ही 10 महिन्यांआधीच काढली. उपोषणाची परवानगी प्रशासनाने नाकारली. संध्याकाळी 6 पर्यंत आचारसंहिता आहे, त्यामुळे परवानगी देण्यात आली नाही. आचारसंहितेमध्ये आंदोलन करता येणार नाही, मी आचारसंहितेचा सन्मान आणि आदर करतो', असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.
'न्यायालयाने आम्हाला नेहमीच साथ दिली आहे. गृहमंत्र्यांकडून आंदोलन करू नये म्हणून दबाव आहे. लोकसभा निकाल आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, म्हणून आंदोलन पुढे ढकला अशी विनंती प्रशासनाने केली आहे', असं जरांगे पाटील यांनी सांगितलं.
'आपल्यावर गुन्हे दाखल करतील, आंदोलन चिरडतील. खोटे गुन्हे दाखल करतील. जाणूनबुजून आपल्याला अडचणीत आणतील. यांचे डाव ओळखावे लागतील. सगळं आपल्यावर ढकलतील. सरकारला कुठेही यशस्वी होऊ द्यायचं नाही,' असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.
दरम्यान मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीमधल्या ग्रामस्थांनीच विरोध केला आहे. जरांगे मागच्या 10 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत, त्यामुळे या आंदोलनाचा ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी देऊ नये, असं निवेदन अंतरवाली सराटीच्या काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलं आहे. यामध्ये जरांगेंच्या शिष्टमंडळातील सदस्यांचाही समावेश आहे.
