मुंबई: सोलापूर, धाराशिवसह मराठवाड्यात पाऊस आणि पुराने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. हाताशी आलेलं पिक पुरात वाहून गेले आहे. तर, पाण्याच्या प्रवाहामुळे शेतातील मातीदेखील वाहून गेली आहे. अस्मानी संकटामुळे बळीराजा मोठ्या संकटात अडकला आहे. अशातच पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला जात आहे. मात्र, अशी मदत केली जात असताना राजकीय नेते मंडळींकडून आपत्तीमध्येही प्रसिद्धीचा हव्यास असल्याचा दिसून येत आहे. या प्रकारावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून सामान्यांदेखील नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने मदतीचा हात दिला जात आहे. मुंबई-ठाणे येथून एकनाथ शिंदे यांनी पाण्याच्या बॉटल्स, किराणा सामान ब्लॅंकेट, सतरंजी त्याआधी साहित्य भरून पाठवण्यात आली आहेत. या मदत साहित्यांनी भरलेली अनेक ट्रक धाराशिवच्या दिशेने पोहचली आहेत.
पूरग्रस्तांच्या मदत साहित्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो देखील लावण्यात आले आहेत. या अगोदरही तानाजी सावंत यांच्या वतीने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या लोकांना साहित्याची मदत करण्यात आली होती. आता या मदत साहित्याच्या आडून होणाऱ्या प्रचारावर भर दिला गेला असल्याचे समोर आले आहे.
आपत्तीत प्रचाराचा सोस...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात आलेल्या साहित्यावर प्रचाराचा सोस कशाला असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात पूराने थैमान घातले आहे. या दरम्यानच्या काळात पालकमंत्री, सरकार अदृष्य झाले होते. आता, मात्र मदतीच्या बहाण्याने एकनाथ शिंदे, धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक प्रचार करण्यात धन्यता मानत असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाने केली आहे.