प्रभाग समिती निवडणुकीचा निकाल काय?
सोमवारी झालेल्या अखेरच्या टप्प्यातील पाच निवडणुकांनंतर मुंबईतील प्रभाग समित्यांचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांच्या नेतृत्वातील महायुतीने ११ प्रभाग समित्यांवर विजय मिळवला आहे. तर, शिवसेना ठाकरे गटाला २ समित्यांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसनेही दोन समित्यांवर विजय मिळाला. तर, मनसे आणि एमआयएमने प्रत्येकी एक प्रभाग समितीवर विजय मिळवला.
advertisement
एस आणि टी प्रभाग समितीत नाट्यमय घडामोड...
सोमवारच्या निवडणुकीत 'एस' आणि 'टी' प्रभाग समितीची निवडणूक सर्वाधिक चर्चेची ठरली. या समितीत महायुती आणि ठाकरे गट पुरस्कृत मित्रपक्षांकडे प्रत्येकी १०-१० असे समसमान संख्याबळ होते. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी ठाकरे गटाचे नगरसेवक सुरेश शिंदे आणि नगरसेविका दीपमाला बढे यांनी चक्क भाजप उमेदवार साक्षी दळवी यांच्या कॉलममध्ये स्वाक्षरी केली. दोन अनुभवी नगरसेवकांनी केलेल्या या तांत्रिक चुकीमुळे ही दोन्ही मते अवैध ठरवण्यात आली आणि भाजपचा विजय सुकर झाला. दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाली असती तर ईश्वरी चिठ्ठीद्वारे निकाल लागला असता. मात्र, ठाकरेंच्या नगरसेवकांनी केलेल्या चुकीमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.
एम-पूर्व मध्ये एमआयएमचा विजय
'एम-पूर्व' प्रभाग समितीमध्ये एमआयएमच्या खैरनुसा हुसेन यांनी ८ मते मिळवत शिवसेनेच्या प्रज्ञा सदाफुले (५ मते) यांचा पराभव केला. 'एम-पश्चिम'मध्येही चुरस पाहायला मिळाली. सोमवारी पार पडलेल्या या निवडणुकांमध्ये महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी पीठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.
