मुंबईतील २० टक्के हॉटेल्सचं शटर डाऊन...
मध्यपूर्वेतील युद्धामुळे गॅस पुरवठ्याची साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम म्हणून मुंबईतील जवळपास २० टक्के हॉटेल्सना गॅसअभावी टाळे ठोकण्यात आले आहे. 'आहार' (Association of Hotels and Restaurants Mumbai) या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ही तर केवळ सुरुवात आहे.
पुढील ३ दिवस अत्यंत कठीण, ५० टक्के हॉटेल्स बंद होणार?
advertisement
गॅसचा हा तुटवडा असाच कायम राहिला, तर परिस्थिती भीषण होऊ शकते. येत्या तीन दिवसांत मुंबईतील तब्बल ५० टक्के हॉटेल्स बंद होण्याची भीती आहार संघटनेने व्यक्त केली आहे. एलपीजी आणि व्यावसायिक गॅसचा पुरवठा न झाल्यामुळे हॉटेल चालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
सरकार दरबारी धाव
या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी हॉटेल संघटना आता आक्रमक झाली आहे. संघटनेचे प्रतिनिधी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांच्या संपर्कात आहेत. तर, आज मंगळवारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचीही भेट घेणार आहेत. गॅस पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी सरकारकडे केली जाणार आहे.
मुंबईच नाही, तर बंगळुरूमध्येही शुकशुकाट!
गॅस टंचाईचा हा विळखा केवळ मुंबईपुरता मर्यादित नाही. बंगळुरूमध्येही अनेक हॉटेल्सनी मंगळवारपासून आपले कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जर युद्ध थांबले नाही आणि पुरवठा सुरळीत झाला नाही, तर संपूर्ण देशातील हॉटेल उद्योग कोलमडून पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
