नाशिककरांसाठी मोठी बातमी आहे. नाशिक ते कोलकाता अशी थेट विमानसेवा येत्या मार्च ते ऑक्टोबर दरम्यान सुरू होण्याची दाट शक्यता असून, नाशिक विमानसेवेचे प्रमुख नितीन सिंग यांनी ही आनंदाची बातमी दिली. नाशिक ते कोलकाता थेट प्रवास करता यावा, ही सुमारे पन्नास हजार बंगाली बांधवांची जुनी मागणी आता मार्गी लागताना दिसत आहे. विशेष म्हणजे, नाशिकमध्ये गेल्या तीन-चार पिढ्यांपासून बंगाली समाज गुण्यागोविंदाने नांदतोय.
advertisement
व्यापार असो वा शिक्षण, इथल्या मातीशी या समाजाचं घट्ट नातं विणलं गेलंय. मात्र, कोलकत्याला जायचं म्हटलं की पुणे किंवा मुंबई गाठणं, तिथल्या ट्रॅफिकमधून विमानतळ गाठणं आणि मग प्रवासाचा घाट घालणं, यात प्रवाशांचा खूप वेळ आणि पैसा खर्च व्हायचा. हाच त्रास वाचवण्यासाठी 'बंगाली कल्चर असोसिएशन'ने गेल्या दोन वर्षांपासून या थेट सेवेसाठी मोठा पाठपुरावा केला, ज्याला आता यश येताना दिसत आहे.
या विमानसेवेसाठी एअर इंडिया, इंडिगो आणि अकासा या कंपन्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यापैकी इंडिगो आणि एअर इंडियाने या मार्गासाठी हिरवा कंदील दाखवल्याने आता नाशिकच्या धावपट्टीवरून कोलकत्याचं विमान लवकरच उडताना दिसेल. बंगाली कल्चर असोसिएशनच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात जेव्हा नितीन सिंग यांनी ही घोषणा केली, तेव्हा उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं.
मुंबई-कोलकाता 'दुरांतो सुपरफास्ट' एक्स्प्रेसला नाशिक रोड स्थानकावर थांबा मिळावा, यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. जर विमान आणि रेल्वे असे दोन्ही पर्याय उपलब्ध झाले, तर नाशिकमधील पर्यटनालाही मोठी चालना मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. मुहू्र्त मिळाला आहे खरा मात्र आता प्रत्यक्षात विमानसेवा कधी सुरू होणार ते पाहावं लागणार आहे.
