लातूर, 13 डिसेंबर : संसदेच्या लोकसभेत आज पिवळ्या धुराच्या नळकांड्या पेटवण्यात आल्या. यामुळे एकच गोंधळ उडाला होता. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीमधून दोन जणांनी सभागृहात उडी मारली आणि पिवळ्या धुराच्या नळकांड्या पेटवल्या. या घटनेतील एक आरोपी लातूरचा असून अमोल शिंदे असं त्याचं नाव आहे. यासंपूर्ण प्रकारानंतर अमोलचे आई-वडील समोर आले आहेत. अमोल लातूरहून दिल्लीला कसा गेला, याबाबत अमोलचे वडील धनराज शिंदे आणि आई केसरबाई यांनी खुलासे केले आहेत.
advertisement
अमोलचे वडील काय म्हणाले?
'9 तारखेला दिल्लीला पोलीस भरती आहे म्हणून तो गेला. मिल्ट्रीचं त्याने बघितलं, आसामला गेला होता, त्याचा पहिला नंबर आला होता. पाच हजार मुलांमध्ये तो पहिला आला होता. कॉल येईल म्हणून सांगितलं, पण त्यानंतर लॉकडाऊन लागलं, तर म्हणाला आता माझं मिल्ट्रीमधलं वय संपलं, त्यामुळे दिल्लीत पोलीस भरती आहे, तिथे चाललो म्हणाला. 9 तारखेला त्याने 7 वाजता घर सोडलं. 10 तारखेला मुंबईला आल्यावर त्याने फोन केला, माझं मोबाईलमधलं चार्जिंग संपलं आहे, तुम्हाला चार्जिंग करून परत फोन लावतो म्हणाला. त्यानंतर आम्हाला काही माहिती नाही', असं अमोलचे वडील म्हणाले.
लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या तरुणाला खासदारांनी पकडलं, नंतर घडलं भयानक LIVE VIDEO
'आज पोलीस घरी आले तेव्हा आम्हाला माहिती झालं. आमचं लेकरू जिवंत आहे का मेलं एवढं सांगा आम्हाला, बाकीचं काही माहिती नाही. आमचा आणि त्याचा संपर्क झाला नाही. तिकडे कोण कोण आहे, याबाबत काहीही माहिती नाही. त्याने दुसऱ्याच्या मोबाईलवरून फोन लावला आणि माझ्या फोनचं चार्जिंग संपलं सांगितलं. त्यानंतर त्याचा फोन लागला नाही. आज थेट पोलीसच घरी आले, त्याची चौकशी केली आणि त्याची कागदपत्र घेऊन गेले', अशी प्रतिक्रिया अमोलच्या वडिलांनी दिली.
अमोलची आई काय म्हणाली?
'माझं काम आहे जातो म्हणाला. भरतीची त्याला आवड होती, झाली नाही त्यामुळे नाराज झाला होता. मग पोलीस भरती तरी बघतो, काही तरी करतो म्हणून गेला. गुन्हा कशाने केला, नोकरीच्या त्यागाने केला, कशाने केला, सगळी कागदपत्र पोलीस घेऊन गेले. सरकारने आम्हाला आमचं लेकरू माझ्यापर्यंत पोहोचवावं', अशी भावना अमोलच्या आईने व्यक्त केली.
लोकसभेत स्मोक कँडल फुटत होत्या, तेव्हा काय करत होते राहुल गांधी? Photo आला समोर
'रोज व्यायामाला जायचा, पहिलीपासून त्याला रनिंगची आवड होती. लातूरला शिकायचं आहे, महिन्याला 4 हजार रुपये द्या म्हणायचा. आम्हाला जमणार नाही, तुझं शिक्षण झालं आहे, कंपनीमध्ये नोकरी कर सांगितलं. जोवर पोलीस भरतीचं वय आहे, तोपर्यंत हे करू द्या म्हणत होता', असं अमोलची आई म्हणाली.
