मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून फलटणच्या डॉक्टर युवतीने जीवन संपविल्याच्या प्रकरणात सुषमा अंधारे यांनी नवनवे दावे करून खळबळ उडवून दिली आहे. बुधवारी त्यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन तरुणीच्या हातावरील संदेश नेमका कुणी लिहिला, असा प्रश्न विचारीत हस्ताक्षर जुळत नसल्याकडे प्रकर्षाने लक्ष वेधले. आरोपींची चौकशी करायची सोडून त्यांना क्लिनचिट देण्यासाठी आणि त्यांची बाजू मांडण्यासाठी महिला आयोग आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रयत्न केल्याची टीकाही अंधारे यांनी केली.
advertisement
बिद्रे प्रकरणाचा दाखला देऊन अंधारेंचा सनसनाटी गौप्यस्फोट, ते एक अक्षर गुंता सोडवणार?
पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात खुनाच्या गुन्ह्याची नोंद होत नव्हती. पोलिसही व्यवस्थितरित्या तपास करीत नव्हते. प्रकरण एकदम गुंगागुंतीचे झाले होते. अनेक गोष्टी लपविण्यात आल्या होत्या. अश्विनीची हत्या झाल्यानंतरही तिच्या मोबाईलवरून आरोपी चॅट करीत होता. परंतु इथेच प्रकरणाला कलाटणी मिळाली आणि चॅटिंग करत असताना Y आणि U अशा दोन शब्दांनी प्रकरणाचे गूढ उलगडले. आताही फलटणच्या डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणात तिच्या हातावरील निरीक्षक हा शब्द आणि तक्रार अर्जातील तोच शब्द यामध्ये तफावत असल्याचा दावा करून तो शब्द मग लिहिला कुणी? तरुणीच्या हातावर सुसाईड नोट कुणी लिहिली? असे प्रश्न उपस्थित करून हत्या की आत्महत्या असा संशय अंधारे यांनी उपस्थित केला.
त्या डिटेल्स चाकणकर यांच्याकडे कशा? सुषमा अंधारे यांच्या आरोपांच्या फैरी
घटना घडल्यावर तिथल्या वस्तू पोलीस जप्त करत असतात. वस्तूंची माहिती प्रचंड गोपनीय असते. त्या वस्तू किंवा मुद्देमाल न्यायालयाच्या परवानगीने उघडायचा असतो. असे असताना मुलीच्या मोबाईलमधून कुणाशी चॅट होत होते, याची माहिती बाहेर आली कशी? तिचे कॉल रेकॉर्ड्स आणि डिटेल्स रुपाली चाकणकर यांना कसे मिळाले? पोलिसांनी द्यायची माहिती चाकणकर यांनी का दिला? त्यांना तो अधिकार कुणी दिला? अशा आरोपांच्या फैरी सुषमा अंधारे यांनी दिल्या.
येथे क्लिनचिट देऊन मिळेल, मुख्यमंत्र्यांनी ऑफिसबाहेर बोर्ड लावावा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसू नये. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यालया बाहेर येथे क्लिनचिट देऊन मिळेल असा बोर्ड लावावा, असा टोला अंधारे यांनी लगावला. फलटण येथे जर ३४ रणजितसिंह निंबाळकर असतील तर ३३ रणजितसिंह निंबाळकर कोण, त्यांचे दोन दोन पीए आहेत का? असा सवाल त्यांनी विचारला.
