तब्बल आठ वर्षांनंतर पुणे महापालिकेची निवडणूक होत आहे. २०१७ साली गमावलेला गड परत मिळविण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे. त्यांनी पुण्यनगरीत तळ ठोकून उमेदवारांच्या प्रभागांतील प्रचारावर भर दिला आहे. प्रचारसभांतून ते भाजपच्या 'कारभारी त्रिकुटावर' हल्लाबोल करीत आहेत. याच आरोपांना मुरलीधर मोहोळ यांनी उत्तरे दिली.
आरोप सिद्ध करून दाखवा, राजकारणातून संन्यास घेतो
advertisement
अजित पवार आमच्यावर विविध आरोप करीत आहेत. पुण्यातील विकासकामे थांबल्याचा दावा ते करीत आहेत. मेट्रो कुणी आणली हे पुणेकरांना विचारा, त्यांच्या जीवनात गेल्या काही वर्षात कसा आणि काय फरक पडलाय, ते ही विचारा. मी जर गुन्हेगारांना मदत केली असेल तर समोर बसून आरोप सिद्ध करून दाखवा, मी राजकारण सोडेन. पण जर तुम्ही हे सिद्ध करू शकला नाहीत तर तुम्ही राजकारण सोडावे, असे आव्हान मोहोळ यांनी दिले.
लोक पुन्हा कुठल्या कारणांसाठी यांना मतदान करतील?
मी नेहमी मुद्द्यांवर बोलण्याचा प्रयत्न करतो. मी विकास कामांवर बोलण्याला प्राधान्य देतो. आम्ही केलेल्या विकासावर लोकांना मते मागतोय. वैयक्तिक टीका हा माझा स्वभाव नाही. त्यांनी पुणेकरांनी काय केलंय? सात वर्षांपूर्वी लोकांनी यांना नाकारलंय. लोक पुन्हा कुठल्या कारणांसाठी यांना मतदान करतील? असा प्रतिप्रश्न मोहोळ यांनी विचारला.
आम्ही ४० लोकांचे तिकीट कापले कारण...
निष्ठावंतांना तिकीट मिळाले नाही, भाजपने अनेकांना नाकारले, असा प्रचार सध्या सुरू आहे. पण चाळीस लोकांचे तिकीट कापले त्याचे कारण ते निष्क्रिय होते, असा नाही. तर मेरिटवर आणखी इतर लोक आमच्याकडे उत्तम होते, त्यामुळे त्यांना संधी दिली गेली, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.
