प्रवास ठरला शेवटचा
या भीषण अपघाताने पुन्हा एकदा रस्त्यांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे सर्व प्रवासी परप्रांतीय मजूर असून ते हरचेरी भागात रस्ते बांधकामाच्या कामासाठी आले होते. दिवसभर राबराब राबल्यानंतर बुधवारी आठवड्याचा बाजार करण्यासाठी हे सर्वजण पाली येथील बाजारपेठेत आले होते. हाताशी असलेल्या तुटपुंज्या पैशांतून घरासाठी लागणारे धान्य आणि जीवनावश्यक वस्तू घेऊन हे मजूर आनंदाने आपल्या उभारलेल्या घराकडे जात होते. मात्र, वाटेतच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
advertisement
नेमकं काय घडलं?
बस चिंद्रवली-कोंडवी परिसरातील एका तीव्र उताराच्या आणि धोकादायक वळणावर आली तेव्हा, अचानक गाडीचे ब्रेक निकामी झाले. उतारावर गाडीचा वेग अनियंत्रित झाला आणि काही क्षणातच ही बस रस्त्यावरून घसरत दरीत कोसळली. दरीत कोसळताना बसचा अक्षरशः चक्काचूर झाला. मृत मोहनेश हा चालकाच्या अगदी शेजारी बसला होता. गाडी पलटी होताना तो बसमधून बाहेर फेकला गेला आणि जागीच जीव गेला.
देवदूत बनून धावले ग्रामस्थ
अपघाताचा भीषण आवाज कानी पडताच चिंद्रवली आणि कोंडवी येथील ग्रामस्थांनी कसलाही विचार न करता दरीच्या दिशेने धाव घेतली. डोंगराच्या कड्याकपारीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. जखमींना तातडीने रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामस्थांच्या या सतर्कतेमुळे इतर १० मजुरांचे प्राण वाचू शकले, मात्र त्यांची प्रकृती अद्याप गंभीर आहे.
प्रशासनाचा दुर्लक्ष की तांत्रिक बिघाड?
रत्नागिरीतील अंतर्गत रस्ते आणि त्यातील धोकादायक वळणे प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालली आहेत. चिंद्रवली-कोंडवीचा हा घाट रस्ता अपघातांच्या दृष्टीने नेहमीच चर्चेत असतो. हा अपघात बसमधील तांत्रिक बिघाडामुळे झाला की रस्त्याच्या दुरवस्थेमुळे, याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र, एका हातावर पोट असलेल्या मजुराच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
