सातारा : आंबा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. कोकणात अनेक ठिकाणी आब्यांच्या बागा पाहायला मिळतात. पण दुष्काळी भागात तुम्ही कधी आंब्याची बाग पाहिली का? नाही ना. पण साताऱ्यातील माण तालुक्यातील नरवणे गावातील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी चक्क दुष्काळी भागातील डोंगर फोडून आंब्याची बागेची लागवड केली आहे.
चंद्रकांत बागल असे या निवृत्त पोलीस अधिकारी शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने एकूण अडीच एकरात 1200 आंबा झाडाची लागवड केली आहे. या झाडांना यंदा भरघोस आंबे आंबे आले आहेत. चंद्रकांत बागल यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर खडकाळ माळ रान फोडून त्या माळरानावर आंब्याची बाग लावली. पूर्ण सेंद्रिय आणि नैसर्गिकरीत्या तयार केलेल्या बागेत यावर्षी आंबा चांगलाच लागला आहे.
advertisement
inspiring story : वडील वॉचमन, आईसह तिनेही केली लोकांच्या घरची धुणीभांडी, पण न खचता आज सीमा बनली PSI
आधीपासून शेतीची आवड असल्यामुळे 58 व्या वर्षी पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर ओसाड, डोंगरी राणांमध्ये काय करावं याचा विचार रिटायर होण्याच्या आधीपासून करत होते. दोन ते अडीच एकर क्षेत्रामध्ये कशाचे उत्पादन घ्यायचे, वडिलोपार्जित डोंगर भाग शेतीलायक कसा करायचा, याचा विचार पोलीस सेवेत होते, तेव्हापासून ते करत होते. पोलीस सेवेत असतानाच त्यांनी कृषी अधिकारी आणि त्यांची मित्रमंडळी त्याचबरोबर माण भागातील फळबाग बागायतदार यांचे मार्गदर्शन घेतले.
याचा संपूर्ण अभ्यास करून त्यांनी 2 वर्षांपूर्वी आपल्या अडीच एकर क्षेत्रामध्ये 1500 आंब्याची लागवड केली आहे. त्यातील 1200 झाडांना आंबे आले आहेत. यामध्ये आतापर्यंत 2 तोडणी झाल्या आहेत. 125 ते 150 रुपये प्रति किला दराना या आंब्याला भाव मिळाला आहे. आतापर्यंत त्यांनी 1 टन 100 किलो आंब्याचे उत्पादन घेत त्याची निर्यातही केली आहे. आणखी यातून 1 टन आंब्याचे उत्पादन होणार असल्याचा विश्वास चंद्रकांत बागल यांनी व्यक्त केला आहे.
सध्या पाणी अभावी हताश होणाऱ्या शेतकरी तसेच बेरोजगार तरुणांपुढे निवृत्त पोलीस अधिकारी चंद्रकांत बागल यांच्या आंब्याच्या बागेच्या माध्यमातून एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. डोंगर माळरानाच्या उतारावर उत्तम फळ शेती करुन भरघोस उत्पन्न घेता येते, हे त्यांनी सिद्ध करुन दाखवले आहे.