सोलापूर - सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातील ग्रामीण भागात ऑक्टोबर महिन्यामध्येच पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावू लागली आहे. मागील 3 महिन्यांपासून येथील ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातील ग्रामपंचायतची बोअरवेल जळाल्याने आबालवृद्धांची पाण्यासाठी परवड होत आहे. जिथे पाणीच मिळत नाही, अशा गावात राहावं तर कशासाठी असे म्हणत महिलांच्या डोळ्यात अश्रू आल्याचे पाहायला मिळत आहे.
advertisement
हराळवाडी गावाची लोकसंख्या ही जेमतेम 3 हजाराच्या आसपास आहे. या गावात पाण्याचा कुठलाही ठोस स्त्रोत नाही. ग्रामपंचायतीसमोर असणाऱ्या बोअरवेलवर गावकऱ्यांची पाण्याची भीस्त अवलंबून आहे. मागील वर्षी राष्ट्रीय पेयजल योजनेच्या दुरुस्तीसाठी आलेल्या 28 लाख रुपयातून गायरान जमिनीतून नवीन पाईप लाईन टाकून ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवून गरजेचे होते. मात्र, जुन्याच पाणीपुरवठा पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली.
जागोजागी या पाईपलाईनला गळती लागल्याने ही योजना सध्या बंद आहे. मागील 3 महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीसमोर असलेला बोरवेल जळाल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी चक्क 3 ते 4 किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.
मोसंबीला विक्रमी 30 हजार रुपये टन भाव, पण शेतकरी नाराज, जालन्यातील परिस्थिती नेमकी काय?
एकाच बोअरवर संपूर्ण गावाचा लोड असल्याने नेहमीच ग्रामपंचायती समोर असलेली बोअरवेल जळत असते. वारंवार ग्रामस्थ स्वखर्चातून या बोरवेलची दुरुस्ती करत असतात. ग्रामस्थांनाच बोअरवेल दुरुस्तीचा खर्च करावा लागत असेल तर पाणीपट्टी, घरपट्टी, नळपट्टी आकारताच कशाला? त्यामुळे अशा गावात राहण्याचा उपयोगच काय? असे म्हणत चक्क महिलांच्या डोळ्यात पाणी आले.
गावातील पाण्याचा प्रश्न न सोडवल्यास विधानसभेला समस्त ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार घालतील, अशा इशारा गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान, आता ग्रामपंचायत प्रशासन किती काळात ही समस्या सोडवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.