मुंबईतील शासकीय कार्यालयांत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी आणि राज्यातील मातांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधान परिषदेत दिलासादायक घोषणांचा पाऊस पाडला आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे आणि रस्त्यांवरील गर्दीतून प्रवास करणाऱ्या महिलांची ओढाताण थांबवण्यासाठी 'लवकर या, लवकर जा' ही अभिनव संकल्पना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
प्रवासातील ओढाताण थांबणार, '३० मिनिटांचा' मास्टरस्ट्रोक
advertisement
मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) शासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या वेळेत लवचिकता आणण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. सकाळी ९.१५ ते ९.४५ या वेळेत कार्यालयात लवकर येऊन जितकी मिनिटे आधी काम सुरू करतील, तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची मुभा महिलांना मिळणार आहे. ही सवलत जास्तीत जास्त ३० मिनिटांपर्यंत असेल. यामुळे मुंबईतील पीक अवर (Peak Hour) गर्दीतून महिलांची सुटका होण्यास मोठी मदत होणार आहे.
मातृत्वाचा सन्मान, १८० दिवसांची प्रसूती रजा
दुसऱ्या एका महत्त्वाच्या निर्णयात, सुनेत्रा पवार यांनी नोकरदार महिलांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तब्बल १८० दिवसांची (६ महिने) प्रसूती रजा मंजूर करण्याची घोषणा केली आहे. इतकेच नव्हे, तर प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास १ वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय देय अर्धवेतन रजा देण्याचाही ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. महिलांना कुटुंब आणि नोकरी यांचा समतोल साधता यावा, यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
