नेमका प्रकार काय?
विरारच्या ग्लोबल सिटी नाक्यावर काल दुपारी ३ च्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. येथे रस्त्याकडेला फळं विकणाऱ्या एका फेरीवाल्याच्या बाजूलाच गटार ओव्हरफ्लो होऊन पाणी बाहेर येत होते. या विक्रेत्याने तेच दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी सफरचंद आणि द्राक्षांवर शिंपडले, जेणेकरून ती ताजी आणि चमकणारी दिसतील.
जागरूक नागरिकाने उघड केला धक्कादायक प्रकार
advertisement
हा घृणास्पद प्रकार विरारमधील जागरूक नागरिक विश्वनाथ शेट्टी यांच्या लक्षात आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर त्यांनी तातडीने ११२ नंबरवर कॉल करून पोलिसांना माहिती दिली आणि अन्न व औषध प्रशासनाकडेही तक्रार केली. दरम्यान, शेट्टी यांनी फेरीवाल्याला जाब विचारल्यानंतर त्याने पाणी गटाराचे नसून चांगलं असल्याचे दावा केला. यासाठी त्याने चक्क ते पाणी पिऊनही दाखवले.
FDA ची 'उडवाउडवीची' उत्तरं?
विश्वनाथ शेट्टी यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, त्यांना कारवाई करण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भातील एक ऑडिओ क्लिपही आता समोर आली आहे. यामुळे "सामान्य माणसाच्या जिवाशी खेळणाऱ्या या विकृतांना प्रशासनाचे अभय आहे का?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
सोशल मीडियावर संतापाची लाट
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विरारमधील नागरिकांनी अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दूषित पाण्यामुळे कॉलरा, टायफॉइड आणि गॅस्ट्रोसारखे गंभीर आजार पसरण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
