Washim Crime News : किशोर गोमाशे,वाशिम : वाशिम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पोलिसांना लग्नाच्या नावाखाली दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. ही टोळी सूरूवातीला श्रीमंत मुलांना हेरायची त्यानंतर थाटामाटात लग्न केल्यानंतर त्याच रात्री घरात चोरी करून पसार व्हायची. या प्रकरणी 3 महिला आणि एका पुरुषाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीमंत मुलगा हेरून ही टोळी आधी मुलगी दाखवायचे.त्यानंतर पसंतीस पडल्यानंतर दोघांचे थाटामाटात लग्न लावून द्यायचे.यानंतर लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी घरातील पैसे आणि दागिने घेऊन पसार व्हायची. अशाप्रकारे या टोळीने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील अनेक कुटुंबांची फसवणूक केली आहे. याच टोळीला आता रिसोड पोलिसांनी जेरबंद केलं आहे.
या प्रकरणी 3 महिला आणि एका पुरुषाला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या टोळीकडून 40 हजार रुपयांचे दागिने आणि तब्बल 1 लाख 25 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच या 4 आरोपीवर फसवणुकीसह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
दरम्यान लग्नाळू मुलांची फसवणूक करणाऱ्या या टोळीला वाशिम च्या रिसोड पोलिसांनी पकडल्याने अनेक गुन्हे उघडकीस येणार आहेत. त्यामुळे या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.