नेमका का पडतोय पाऊस?
हवामान तज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरात तामिळनाडूच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तिथे चक्राकार वारे वाहत आहेत. या हवामान प्रणालीचा अप्रत्यक्ष फटका मराठवाड्याला बसत आहे. दक्षिणेकडून येणाऱ्या ढगांमुळे बीडसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण निर्माण झाले असून त्यामुळेच ही अवकाळी रिमझिम सुरू आहे. पुणे जिल्ह्यातही काही भागांमध्ये 10-15 मिनिटं रिमझिम सरी बरसल्या.
advertisement
आता थंडीचा कडाका वाढणार!
मागच्या 48 तासात तापमान १७ अंशांवर होते, त्यामुळे थंडीचा प्रभाव कमी जाणवत होता. मात्र, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १४ जानेवारी म्हणजेच मकरसंक्रांतीपासून हे ढगाळ वातावरण निवळायला सुरुवात होईल. त्यानंतर उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे १५ ते १८ जानेवारी दरम्यान थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. तापमान थेट १२ अंशांच्या खाली जाण्याची शक्यता असल्याने रात्रीची 'हुडहुडी' वाढणार आहे.
शेतकरी चिंतेत: रब्बी पिकांना फटका बसणार?
पावसामुळे धारूर परिसरातील नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला आणि रब्बी पिकांना थोडी ओल मिळाली असली, तरी येणाऱ्या थंडीचा कडाका शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा आहे. तापमान घटल्याने हरभरा आणि गहू या पिकांवर मोठ्या प्रमाणात दव पडण्याची शक्यता आहे. यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. कोकणातही ढगाळ वातावरण असल्याने आलेल्या आंबा काजूचा मोहोर गळून पडला आहे.
