मिळालेल्या माहितीनुसार, भक्तीचा विवाह म्हाळसापूर येथील अमोल कोरडे याच्याशी झाला होता. संसाराच्या वेलीवर तीन गोंडस मुलींची फुले उमलली. मात्र, हे सुख सासरच्या मंडळींच्या डोळ्यांत खुपू लागले. तुला फक्त मुलीच होतात, घराण्याला वारस हवा आहे, असे म्हणत पती अमोल, सासरा अर्जुन कोरडे आणि सासू आशाबाई कोरडे यांनी मागील अडीच वर्षांपासून भक्तीचा छळ सुरू केला होता. शारीरिक आणि मानसिक त्रासाने तिचे जगणे असह्य झाले होते.
advertisement
दुसरे लग्न करण्यासाठी मागत होते परवानगी
सासरच्या मंडळींचा नराधमपणा इतक्यावरच थांबला नाही. पती अमोल याला दुसरे लग्न करायचे असल्याने भक्तीने त्याला संमती द्यावी, यासाठी तिच्यावर अमानुष दबाव टाकला जात होता. "तू दुसऱ्या लग्नाला परवानगी दे आणि तसे बाँड पेपरवर लिहून दे, अशी सक्ती करत तिला वारंवार मारहाण केली जात असे. आपल्या तीन मुलींच्या भविष्याचा विचार करून भक्ती हा अपमान सोसत होती, मात्र सासरच्या मंडळींचा क्रूरपणा वाढतच गेला.
महिनाभरापासून मृत्यूशी झुंज
सततचा अपमान आणि छळाला कंटाळून भक्तीने 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी राहत्या घरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात आणि नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल महिनाभर डॉक्टरांनी तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र ६ मार्च रोजी तिची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे म्हाळसापूर परिसरात संतापाची लाट उसळली असून, आपल्या आईच्या मायेला पारख्या झालेल्या त्या तीन मुलींच्या आक्रोशाने उपस्थितांचे काळीज पिळवटून निघाले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. भक्तीच्या मृत्यूनंतर तिची आई गंगूबाई प्रभू ठोकळ यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी पती अमोल कोरडे, सासरा अर्जुन कोरडे आणि सासू आशाबाई कोरडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे
हे ही वाचा :
