सातारा : आधुनिक शेतीची कास धरून आजकाल अनेक शेतकरी लाखोंची उलाढाल करताना दिसतात. शिक्षण झालं की, नोकरीच्या मागे न लागता शेती करणं पसंत केल्याची आता अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. सातारच्या पाडळी गावातील एका तरुण शेतकऱ्यानं कंपनीची नोकरी सोडून आपल्या 3 एकर शेतात कोरफडची लागवड केली. ऋषिकेश ढाणे असं या प्रगतशील शेतकऱ्याचं नाव.
advertisement
कोरफडला आंतराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे. शिवाय कोरफडच्या विविध पदार्थांना मोठ्या प्रमाणात देशांतर्गत मागणी असल्यानं ऋषिकेश यांना या लागवडीतून चांगलाच फायदा झाला. फक्त कोरफडमधून त्यांची वर्षाला लाखोंची नाही तर, तब्बल कोट्यवधींची उलाढाल आहे. कोरफड लागवडीतून आणि त्यातून बनवलेल्या उत्पादनांमधून त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे कोट्यवधी.
जिद्द आणि शेतात 18 तास मेहनत करून ऋषिकेश आणि त्यांच्या कुटुंबियांनी ही आर्थिक प्रगती गाठली. त्यांची मार्केटिंग टीम, मित्र आणि 20 हून अधिक शेतमजुरांमुळे आर्थिक स्थिती सुधारल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, जगभरात सध्या आयुर्वेदिक आणि शाश्वत वस्तू वापरण्यावर बहुतांश जणांचा भर असल्याचं दिसून येतं. त्वचेसह शरिराच्या अनेक आजारांवर रामबाण मानल्या जाणाऱ्या कोरफडची भारतासह परदेशात सर्रास विक्री होते.
कोरफडचं महत्त्व लक्षात घेऊन त्याची लागवड करण्याची कल्पना तशी धाडसाचीच होती, मात्र ऋषिकेश आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या शेतात व 13 एकर शेताच्या बांधावर कोरफडची लागवड केली. ऋषिकेश यांनी नोकरी सोडून घेतलेल्या या निर्णयाला अनेकजणांनी विरोध केला, परंतु ते मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते. आज ते इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरले आहेत.
कौटुंबिक परिस्थिती बेताची असल्यानं वयाच्या विसाव्या वर्षी ऋषिकेशनं मार्केटिंग कंपनीत नोकरी केली. परंतु त्यात त्यांचं मन रमलं नाही. मग आपल्या गावी परतून शेती करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 2007 मध्ये जेव्हा गावातील लोकांनी कोरफड टाकून दिले तेव्हा ऋषिकेश यांनी त्याच 4000 रोपांची लागवड केली. त्यापासून त्यांनी साबण, शॅम्पू, ज्यूस अशी वेगवेगळी उत्पादनं तयार करण्यास सुरूवात केली. त्यांची ही कल्पना इतर शेतकऱ्यांसाठी खरोखर प्रेरणादायी आहे.