सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये आले हे पीक प्रामुख्याने सातारा व कोरेगाव तालुका यामध्ये घेण्यात येते. परंतु लोणंद येथील प्रगतशील शेतकरी रमेश विठ्ठल अडसूळ यांनी आपल्या पाडेगाव येथील शेतीमध्ये पारंपारिक पिकांच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळत नसल्याने शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी व्यवसायाबरोबरच शेतीकडेही लक्ष केंद्रित करून पीक पद्धतीत बदल करण्याचे ठरवून आले. या पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
रमेश अडसूळ यांची फलटण तालुक्यात पाडेगाव याठिकाणी स्वतःची 8 एकर शेती आहे. या शेतीमध्ये पारंपारिक ऊस या पिकाला फाटा देत रमेश अडसूळ यांनी दीड एकरात आले पिकाची बेड बनवून लागवड केली. यासाठी तीन महिने पुर्व मशागत करताना शेणखत, कोंबडखत, राख, निंबोळी आदींच्या दीड एकरात एकूण 15 ट्रॉली टाकल्या तर पिकावर तीन बेसल डोस व वेळोवेळी फवारणी केल्या आहेत. पिकासाठी संपूर्ण ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला आहे. पहिल्या वर्षी त्यांनी सर्व आले बियाणे म्हणून विक्री केले तर यावर्षी त्यांना आले पिकातून एकरी 17 लाख रुपये याप्रमाणे आल्याचे उत्पादन मिळाले आहे.
यामध्ये त्यांना आले पिकासाठी त्यांना एकूण एकरी 6 लाख रुपये असा एकूण 9 लाख खर्च आला आहे. खर्च वजा जाता त्यांना आले पिकातून एकूण एकरी 11 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. यावेळेस काढण्यात येत असलेल्या दीड एकर आले पिका व्यतिरिक्त अजून सव्वादोन एकरात त्यांनी आल्याची लागवड केली आहे.
बीडच्या शेतकऱ्याची कमाल! रेशीम शेती करत 1 एकरातून वर्षाला 6 लाखांची कमाई, VIDEO
या लोकांचे मिळाले मार्गदर्शन -
रमेश अडसुळ यांनी नायगावचे प्रगतशील शेतकरी बाबासो नेवसे यांच्या सल्ल्यानुसार आले पिकाची लागवडीसाठी निवड केली. तर त्यांना वाठार स्टेशन येथील अमोल ॲग्रोचे मालक मोहन फाळके व लोणंद येथील सोमेश्वर कृषी सेवा केंद्राचे सोमनाथ लकडे यांचे पीक व्यवस्थापनपर मार्गदर्शन मिळाले.
रमेश अडसुळ यांना आले पिकातून एकरी 45 टन इतके विक्रमी उत्पादन मिळाले आहे. घाऊक बाजारात सरासरी 42 हजार रूपये प्रती क्विंटल इतका दर मिळाला असुन एकूण 17 लाख रुपये मिळाले. यामध्ये खर्च 6 लाख वजा जाता 11 लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे.
एकाच पिकाच्या लागवडीवर अवलंबून न राहता पीक पद्धतीत विविधता आणण्याचे धोरण रमेश अडसुळ यांनी अवलंबले आहे. यात त्यांनी आपल्या शेतात केळी, पपई, आंबा, सफरचंद या फळबागाची आंतरपीक म्हणून लागवड केली आहे. योग्यप्रकारे शेती केल्यास ती निश्चितपणे परवडते आणि फायदेशीर शेती होऊन शकते हेच रमेश अडसुळ यांनी दाखवून दिले आहे.
साताऱ्यातील प्रगतशील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देऊन नवीन नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आल्या सारख्या पिकातून जास्तीत जास्त उत्पादन काढून यशस्वी शेती करण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी आपण सदैव तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले. तसेच फलटण व खंडाळा तालुक्यातील अनेक शेतकरी आले या प्लॉटला भेट देऊन या पिकाबाबत माहिती घेतो. पाडेगावच्या काही शेतकऱ्यांनी आपल्याकडून मार्गदर्शन घेऊन आले शेती करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीही त्यांनी दिली.