25 हजार रुपयांचं खास बक्षीस
परिवहन आयुक्त किंजल सिंह यांनी सोमवारी यासंबंधीचे निर्देश दिले आहेत.उत्तर प्रदेशात योगी सरकारने या योजनेसाठी पुढाकार घेतला आहे. या योजनेत साधारणपणे 5000 रुपये बक्षीस म्हणून दिले जातात. मात्र योगी सरकारने ही रक्कम थेट 25 हजार रुपये ठेवली आहे. अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे, हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण मागच्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे.
advertisement
सरकारने सांगितला या योजनेचा उद्देश
2023 मध्ये देशात 1.7 लाख अपघात झाले, ज्यात 1.6 लाख लोकांचा मृत्यू झाला. यापैकी उत्तर प्रदेशचा आकडा चिंताजनक आहे. एकट्या उत्तर प्रदेशात 23,771 अपघातांमध्ये 22,532 लोकांना जीव गमवावा लागला, जो देशाच्या एकूण अपघातांपैकी १४ टक्के आहे. अपघातानंतर भीतीपोटी लोक जखमींना मदत करायला पुढे येत नाहीत, ज्यामुळे अनेक जीव वेळेवर उपचार न मिळाल्याने दगावतात. ही भीती दूर करून लोकांना मदतीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने तयार केलेली ही योजना आता राज्य सरकार लागू करत आहे.
गुड समारिटन योजनेच्या नावामागची कहाणी
'मोटर वाहन अधिनियम, 1988' नुसार, 'गुड समारिटन' म्हणजे अशी व्यक्ती जी कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवता अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मदत करते. परिवहन आयुक्त किंजल सिंह यांनी स्पष्ट केले आहे की, जखमी व्यक्तीला मदत करणाऱ्या व्यक्तीला 'राह-वीर' म्हणून ओळखले जाईल. जखमी व्यक्तीचा जीव वाचला नाही, तरीही मदत करणाऱ्या व्यक्तीला हे बक्षीस नक्कीच दिले जाईल. ही योजना लोकांना आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पुढे येण्यास मोठी प्रेरणा देईल. या योजनेत गंभीर दुखापत, तीन दिवसांपेक्षा जास्त रुग्णालयात दाखल असणे, मेंदू किंवा पाठीच्या कण्याला झालेली दुखापत आणि उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे.
पारदर्शकता राखण्यासाठी सरकारची अट
या योजनेनुसार, प्रत्येक 'राह-वीर' व्यक्तीला प्रति अपघात 25,000 रुपये रोख बक्षीस दिले जाईल. जर एकाच व्यक्तीने एकाच अपघातात अनेक जखमींना मदत केली, तरीही त्याला 25000 रुपये इतकी रक्कम मिळेल. मात्र, जर एकाच जखमीला एकापेक्षा जास्त लोकांनी मदत केली, तर ही बक्षीस रक्कम मदत करणाऱ्या व्यक्तींमध्ये समान वाटली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी, पोलिसांनी रुग्णालयाकडून मदत करणाऱ्या 'राह-वीर' व्यक्तीच्या माहितीची पडताळणी करणे बंधनकारक असेल.
मदत करणाऱ्या व्यक्तीचे नाव, संपर्क क्रमांक आणि जखमी व्यक्तीबद्दलची सर्व माहिती पोलीस नोंद करतील. ही माहिती पुढे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे पाठवली जाईल. गाझियाबादचे प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) पीके सिंह यांनी सांगितले की, ही योजना लोकांना कोणत्याही भीतीशिवाय (उदा. पोलीस चौकशी) मदत करण्यासाठी प्रोत्साहित करेल. पोलीस आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) 'राह-वीर' व्यक्तीच्या दाव्याची छाननी करतील आणि त्यानंतर ही समिती पुरस्काराचे वितरण करेल. या योजनेमुळे रस्त्यांवरील अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा आहे.