सामान्य माणसाचं असामान्य स्वप्न
दिलीप पाटील यांचा जन्म कोल्हापुरातील एका साध्या कुटुंबात झाला. त्यांचं बालपण आणि तरुणपण या शहराच्या मातीत आणि कुस्तीच्या संस्कृतीत घडलं. कोल्हापुरातील प्रतिष्ठित केआयटी कॉलेजमधून त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणानंतर त्यांनी किर्लोस्कर ब्रदर्स आणि पुण्यातील पूनावाला ग्रुपसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये जवळपास एक दशकाहून अधिक काळ नोकरी केली. या काळात त्यांनी उद्योग क्षेत्रातील बारकावे, तांत्रिक कौशल्य आणि व्यवस्थापनाचे धडे घेतले. पण त्यांच्या मनात कुठेतरी स्वतःचं काहीतरी करून दाखवण्याची आग धगधगत होती.
advertisement
1990 च्या दशकात कोल्हापूरमध्ये आधुनिक व्यायामशाळांचा ट्रेंड हळूहळू रुजत होता. पारंपरिक तालमी आणि कुस्तीच्या जोडीला तरुणांमध्ये जिम आणि फिटनेसचं आकर्षण वाढत होतं. पण दिलीप यांच्या तीक्ष्ण नजरेने एक गोष्ट टिपली कोल्हापुरात जिम साहित्य बनवणारी एकही कंपनी नव्हती. ट्रेडमिल, वेट लिफ्टिंग मशीन, डंबेल्स यांसारखी उपकरणं पुणे, मुंबई किंवा इतर मोठ्या शहरांमधून आयात करावी लागत होती. याच संधीचा फायदा घेत दिलीप यांनी 1998 मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
अडचणींचा डोंगर आणि जिद्दीचा विजय
कोणताही नवीन व्यवसाय सुरू करणं सोपं नसतं आणि दिलीप यांच्यासाठीही हा प्रवास खड्ड्यांनी भरलेला होता. भांडवलाचा अभाव, तांत्रिक ज्ञानाची कमतरता आणि स्थानिक बाजारपेठेतील अनिश्चितता यामुळे त्यांच्यासमोर अनेक आव्हानं उभी ठाकली. स्थानिक तालमींमधील पैलवान, जिम मालक आणि फिटनेस प्रशिक्षक यांच्याशी सतत चर्चा करून त्यांनी बाजारपेठेच्या गरजा समजून घेतल्या. त्यांनी छोट्या कार्यशाळेतून जिम साहित्य बनवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी डंबेल्स, वेट प्लेट्स आणि साध्या व्यायाम बेंचपासून सुरुवात केली.
दिलीप यांच्या उपकरणांची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि परवडणारी किंमत यामुळे त्यांना हळूहळू मागणी वाढू लागली. त्यांनी स्थानिक कारागिरांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. यासोबतच त्यांची मुलगी स्मृती पाटील हिनेही व्यवसायात सक्रिय सहभाग घेतला. स्मृतीने आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल मार्केटिंगचा वापर करत कंपनीला नव्या उंचीवर नेऊन तरुण उद्योजकांपर्यंत नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करतेय. ऑनलाइन मार्केटिंग, सोशल मीडियाचा वापर आणि वेबसाइटच्या माध्यमातून त्यांनी कंपनीची व्याप्ती वाढवत आहे.
स्थानिक ते राष्ट्रीय ब्रँड
आज दिलीप पाटील यांची कंपनी दिजो कम्बाईनस् केवळ कोल्हापूरपुरती मर्यादित राहिलेली नाही. महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर यासह कर्नाटक, गुजरात, गोवा आणि आंध्र प्रदेशातील अनेक शहरांमध्ये त्यांचे जिम साहित्य पुरवठा होत आहे. ट्रेडमिल, सायकलिंग मशीन, कार्डिओ उपकरणं, वेट लिफ्टिंग मशीन आणि मल्टी-जिम स्टेशन यांसारख्या अत्याधुनिक उपकरणांनी त्यांनी बाजारपेठेत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. यामधून त्यांना महिन्याला 3 लाखांच्यावरती कमाई होत आहे.
कंपनीने स्थानिक कारागिरांना रोजगार उपलब्ध करून मेक इन इंडियाच्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणलं. सध्या त्यांच्या कारखान्यात 200 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत आणि त्यापैकी बहुतांश स्थानिक आहेत. यामुळे कोल्हापूरच्या अर्थकारणालाही चालना मिळाली आहे. विशेष म्हणजे, दिलीप यांनी आपल्या उपकरणांची गुणवत्ता कायम राखत परदेशी ब्रँड्सना कडवी टक्कर दिली आहे. त्यांच्या कंपनीने आता निर्यातीच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे आणि लवकरच मध्य पूर्व आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये त्यांचे साहित्य पोहोचण्याचं उद्दिष्ट आहे.
फिटनेसचं मिशन आणि सामाजिक योगदान
दिलीप पाटील यांचं यश केवळ आर्थिक यशापुरतं मर्यादित नाही. त्यांनी कोल्हापुरातील तरुणांना फिटनेस आणि व्यायामाचं महत्त्व पटवून दिलं. त्यांच्या उपकरणांमुळे अनेक तालमी आणि जिम्सना आधुनिक स्वरूप मिळालं. कोल्हापूर हे कुस्तीचं माहेरघर आहे, पण आधुनिक काळात फिटनेससाठीही आपण अग्रेसर असलं पाहिजे, असं दिलीप नेहमी सांगतात. त्यांनी स्थानिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये फिटनेस जागृती कार्यक्रम आयोजित केले आणि गरजू तालमींना सवलतीच्या दरात उपकरणं उपलब्ध करून दिली. यासोबतच, त्यांनी कोल्हापुरातील काही पारंपरिक तालमींना आधुनिक सुविधांनी सुसज्ज केलं. कुस्ती आणि जिम यांचा सुंदर मिलाफ घडवून आणत त्यांनी कोल्हापूरच्या सांस्कृतिक वारशाला नवं रूप दिलं.
प्रेरणादायी यशोगाथा
दिलीप पाटील यांच्या यशाकडे पाहून आज अनेक तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळत आहे. एका सामान्य माणसाने आपल्या जिद्दीच्या जोरावर कुस्ती पंढरीत जिम साहित्याचं साम्राज्य उभं केलं, ही गोष्ट खरोखरच प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या यशामुळे कोल्हापूरचं नाव आता केवळ कुस्तीसाठीच नव्हे, तर फिटनेस उद्योगातही अभिमानाने घेतलं जात आहे.
दिलीप यांचा हा प्रवास सिद्ध करतो की, जर मनात जिद्द असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर कोणतीही स्वप्नं असाध्य नाहीत. त्यांच्या या यशोगाथेने कोल्हापूरच्या मातीतून एक नवा उद्योजक घडवला, जो आज अनेकांसाठी प्रेरणास्थान बनला आहे.