मुंबई शहरात अनेक दशकांपासून इराणी कॅफेंची परंपरा आहे. या कॅफेंमध्ये मिळणारे खास इराणी पदार्थ ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. इराणी खजूर, सोहन हलवा, केसर आणि विशेषतः ‘गज’ या पदार्थांची मोठी मागणी असते. ‘गज’ हा उंटाच्या दुधापासून आणि पिस्त्यापासून तयार होणारा गोड पदार्थ इराणमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. मात्र सध्या या पदार्थांचा पुरवठा खंडित झाल्याने कॅफे मालक चिंतेत आहेत.
advertisement
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा घाव मुंबईवर! कांदिवलीच्या दीक्षितचा मिसाईलने घेतला जीव
दादरच्या हिंदू कॉलनी परिसरातील कॅफे कॉलनी या कॅफेचे मालक सांगतात की, “युद्धामुळे आमचे नियमित सप्लायर्स माल पाठवू शकत नाहीत. बंदरांवर माल अडकतो आहे, तर काही ठिकाणी निर्यातच थांबवण्यात आली आहे. त्यामुळे इराणमधील अनेक खास वस्तू सध्या उपलब्ध नाहीत.” त्यांच्या मते, यामुळे ग्राहकांना अपेक्षित पदार्थ देता येत नसल्याने विक्रीत घट झाली आहे.
आयात खर्च वाढल्याने जे काही मर्यादित प्रमाणात माल येतो आहे, त्याचे दरही वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना जास्त किंमत मोजावी लागत आहे. काही कॅफेंनी पर्याय म्हणून स्थानिक बाजारातून मिळणाऱ्या वस्तूंचा वापर सुरू केला असला, तरी चवीत आणि दर्जात फरक जाणवत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
एकूणच इराणमधील अस्थिर परिस्थितीचा परिणाम हजारो किलोमीटर दूर असलेल्या मुंबईतील इराणी कॅफेंवर होत असून या पारंपरिक व्यवसायासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. परिस्थिती लवकर सुधारावी आणि व्यापार पूर्ववत व्हावा अशी अपेक्षा कॅफे मालक व्यक्त करत आहेत.





