ऐरोली- कटाई एलिव्हेटेड रोडमुळे कल्याण, डोंबिवली आणि ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका मिळणार आहे. सध्या नवी मुंबई ते कल्याण किंवा डोंबिवलीला पोहोचण्यासाठी बाय रोड दीड तासांचा अवधी लागतो आणि जर तुम्ही ट्रान्स हार्बर रेल्वेने गेलात कल्याण- डोंबिवली- ठाणे आणि ठाणे- तुर्भे- नेरूळ- पनवेल अशा मार्गे प्रवाशांना दीड ते दोन तासांचा अवधी लागतो. या नव्या एलिव्हेटेड मार्गामुळे प्रवाशांच्या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बचत होणार आहे. बाय रोड आणि रेल्वे मार्गे लागणाऱ्या वेळेची आता मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. गर्दीवर तोडगा काढण्यासाठी ऐरोली- कटाई नाका उन्नत रस्ता सुरू करण्यात आलाय. हा रस्ता सुरू झाल्यास दीड तासाचा प्रवास फक्त १५ मिनिटांत पूर्ण होणार आहे.
advertisement
ऐरोली- मुंब्रा प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी MMRDA ने मुंब्रा- कटाई नाका उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला. हा मार्ग देसाई खाडीतून जात आहे. कनेक्टिव्हिटीसाठी पारसिक टेकड्यांमधून एक भूमिगत बोगदा बांधण्यात आलाय. 2018 मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. एलिव्हेटेड रोडच्या पहिल्या टप्प्यात ठाणे- बेलापूर रोड ते एनएच 4 पर्यंत 3.48 किमी लांबीच्या आणि दुसऱ्या टप्प्यात ठाणे- बेलापूर मार्गावरील ऐरोली पुलापासून जोडणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे. 6.71 किमी लांबीचा हा रस्ता देसाई खाडी ओलांडेल. 2026 वर्षाच्या शेवटपर्यंत हा रस्ता सर्वांसाठी खुला होईल, असा अंदाज वर्तवला जातोय. या रस्त्यामुळे चाकरमान्यांची वाहतूक कोंडीच्या समस्येतून कायमची सुटका होणार आहे.
पारसिक टेकड्यांमधील बोगद्यांतून जाणारा हा रस्ता चार लेनचा असल्याने डोंबिवलीजवळील ऐरोली ते कटाई नाका दरम्यानचा प्रवास अधिक जलद होणार आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर ऐरोली परिसरातून जाणाऱ्या अवजड वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होईल. मुंबई- कल्याण आणि कल्याण- मुंबई दरम्यान ये- जा करणारी वाहने थेट या एलिव्हेटेड मार्गाचा वापर करू शकतील. परिणामी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण- डोंबिवली परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल.
