मुंबई: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस. संपूर्ण देशभरातून लाखो भीम अनुयायी मुंबईतील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येत असतात. यामध्ये अनेक कलाकारही असतात. आपल्या भीमगीतांतून ते सामाजिक प्रबोधनाचेही कार्य करत असतात. मराठवाड्यातून चैत्यभूमीवर आलेल्या कलाकारांनी बाबासाहेबांनी सांगीतिक मानवंदना दिली. यावेळी लोकल18 सोबत बोलताना त्यांनी आपल्या प्रवासाबद्दल माहिती दिली.
advertisement
महापरिनिर्वाण दिनी अनेक कलाकार चैत्यभूमीवर आपल्या गाण्यांतून बाबासाहेबांना मानवंदना देत असतात. यंदा बीड आणि पुण्याहून आलेल्या कलाकारांनी ‘भीमा घे पुन्हा, जन्म तू..’ म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच यावेळी बाबासाहेबांची विविध गाणी, चळवळीची गाणी गायली. हा भीमगीतांचा आणि चळवळीच्या गाण्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी अनेक अनुयायांनी गर्दी केली होती.
आम्ही कचरा उचलणार नाही, पण....; 3500 अनुयायांची बाबासाहेबांना अनोखी मानवंदना, तुम्हीही कराल कौतुक
पुण्याहून आलेल्या शिंदे ताई सांगतात “मी गेले अनेक वर्षे चैत्यभूमीवर येत आहे. माझं संगीताचं शिक्षण झालं असून इथे बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी आम्ही सगळे दरवर्षी दाखल होतो. पण फक्त मानवंदना न देता आम्ही आमच्या जवळील कला सादर करतो. जवळपास 40 वर्षांहून अधिक वर्षांपासून आम्ही सर्व कलाकार मंडळी इथे जमा होतो आणि जमलेल्या समुदायाला संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या कार्याची जाणीव करून देतो.”
“बाबासाहेब होते म्हणून आम्ही आहोत” अशी भावना गौतम सरवदे व्यक्त करतात. ते पुढे म्हणाले की, “या समाजाला पुन्हा एकदा बाबासाहेबांची गरज आहे. सध्याची नेते मंडळी ही फक्त मतांसाठी राजकारण करतात. मात्र बाबासाहेब यांनी जनतेच्या हिताचे, आम्हा बांधवांच्या हिताचे जाणून समाजात कार्य केलं. त्यांचं प्रत्येक कार्य समाजाला एक पाऊल पुढे नेणारे होतं. म्हणून पुन्हा एकदा बाबासाहेबांची गरज आपल्या सर्वांना भासते.”
कलाकार मंडळी 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर या दिवशी इथे येऊन बाबासाहेबांच्या गाण्यांचा कार्यक्रम सादर करतात. तसेच अनेक कलाप्रकार सादर करणारी मंडळी येथे पाहायला मिळतात. दादरच्या चैत्यभूमी परिसरात लाखोंच्या संख्येने आलेला हा जनसमुदाय दरवर्षी येथे दाखल होत असतो. यंदा देखील सकाळपासून जवळपास लाखोंनी आलेली मंडळी बाबासाहेबांना वंदन करून आपापल्या घरी परतली आहेत.