गेल्या काही वर्षांमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांचे अनेक अपघात घडले. दाट धुके, सिग्नल न दिसणे, तांत्रिक बिघाड किंवा अगदी लहान मानवी चुका, इतक्या किरकोळ कारणांमुळेही गंभीर घटना घडल्या. अपघात रोखण्यासाठी तांत्रिक उपायांची गरज तीव्रपणे जाणवत होती. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने ‘कवच’ प्रणाली बसवण्याचा मोठा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला होता, आणि आता हे काम अखेर पूर्णत्वास येत आहे.
advertisement
रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट सांगितले आहे की, “सुरक्षितता प्रथम, त्यानंतरच वेग” म्हणूनच कवच प्रणाली पूर्ण बसवून सुरू होईपर्यंत कोणत्याही गाडीला 160 किमी वेग दिला जाणार नाही.
कवच काय आहे?
कवच ही अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित भारतीय सुरक्षा प्रणाली आहे. ती गाडीचा वेग, सिग्नलची स्थिती आणि पुढील रुळावरील परिस्थिती यांची सतत तपासणी करते.
काही प्रमुख वैशिष्ट्ये :
1) गाडी वेगमर्यादेपेक्षा जास्त गेली तर आपोआप ब्रेक लावते, दोन गाड्यांची टक्कर होण्याची शक्यता असेल तर गाडी थांबवते.
2) Signal Passed at Danger (SPAD) म्हणजेच लाल सिग्नल ओलांडल्यास तात्काळ नियंत्रण घेते.
3) धुके किंवा कमी दृष्टीक्षेपातही गाडी सुरक्षितपणे चालते.
4) मानवी चुकांवर तांत्रिक नियंत्रण ठेवते. यामुळे अतिवेगात होऊ शकणारे अपघात जवळजवळ अशक्य बनतात.
मुंबई–दिल्ली मार्गावरील स्थिती
एकूण मार्ग : 1,384 किमी
वेस्टर्न रेल्वेचा हिस्सा : 694 किमी (मुंबई सेंट्रल–नागदा)
वेग वाढीचे काम सुरू असलेला भाग : विरार–वडोदरा (390 किमी)
सध्याचा वेग : 130 किमी प्रतितास
नियोजित वेग : 160 किमी प्रतितास
ट्रॅक अपग्रेडेशन, सिग्नलिंग, ओव्हरहेड वायर्सची मजबुती, ब्रिज तपासणी अशा सर्व तांत्रिक कामांच्या अंतिम चाचण्या सुरू आहेत
कवच बसवल्यानंतर काय बदलणार?
1) प्रवास आणखी जलद होईल. प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल.
2) अपघातांची शक्यता अत्यंत कमी होईल.
3) धुके, पाऊस, कमी दृष्टी यांचा गाड्यांवर परिणाम कमी होईल.
गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर, हे तंत्रज्ञान प्रवाशांसाठी मोठा दिलासा आहे. भारतीय रेल्वेचा हा निर्णय मुंबई–दिल्ली प्रवासाला नव्या युगात नेणारा आहे.






