नेमका धोका काय?
सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या गोपनीय पत्रानुसार, दहशतवादी मुंबईतील गर्दीची ठिकाणे आणि महत्त्वाच्या प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये विशेषतः आयएसआयचं समर्थन करणाऱ्या गटांचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, स्फोटकांचा वापर करून हा नियोजित हल्ला केला जाऊ शकतो, असा स्पष्ट उल्लेख या पत्रात असल्याने यंत्रणांनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे.
advertisement
विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर कडा पहारा
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आंतरराष्ट्रीय आणि घरगुती विमानतळांची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. 'सीआयएसएफ'लाअतिरिक्त सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय सीएसएमटी, दादर आणि कुर्ला यांसारख्या प्रमुख रेल्वे स्थानकांवर तपासणी वाढवण्यात आली आहे. मंत्रालयासोबतच शहरातील प्रसिद्ध धार्मिक स्थळे आणि ऐतिहासिक इमारतींभोवती कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे.
नागरिकांसाठी हायअलर्ट
दहशतवाद्यांकडून काश्मीर किंवा थेट महाराष्ट्रातीलच काही भागांतून स्फोटके मिळवून हल्ल्याची योजना आखली जात आहे. यामुळे स्थानिक पोलिसांनाही संशयास्पद हालचालींवर बारीक नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती, बेवारस वस्तू किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने १०० किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, असे सांगण्यात आले आहे.
