मुंबई : आपण गणेशोत्सवाची आतुरतेनं वाट पाहतो. त्या दिवसांत सर्वत्र अगदी प्रसन्न वातावरण असतं. आता बाप्पाच्या आगमनाला केवळ 2 महिने उरले आहेत. तेही झटपट निघून जातील. दरवर्षी खास गणेशोत्सवासाठी मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येनं गावाकडे जातात. म्हणूनच कोकणसह राज्यातील सर्व विभागांमध्ये या सणानिमित्त नियमित आणि विशेष गाड्यांचं आरक्षण 4 जुलैपासून सुरू होणार आहे. यंदा बसच्या वेळापत्रकात नेमका काय बदल करण्यात आलाय, पाहूया.
advertisement
मुंबई सेंट्रल, परळ, पनवेल, कुर्ला नेहरूनगर इथून 2 आणि 3 सप्टेंबरपासून जादा गाड्या सुटणार आहेत. कणकवली, राजापूर, विजयदुर्ग, दापोली, भालावली, देवगडदरम्यान जादा एसटी फेऱ्या चालवण्यात येतील.
हेही वाचा : 'या' 11 गणपतींचं एकदा तरी घ्या दर्शन, एकाचा आहे शिवाजी महाराजांशी संबंध!
प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी गाड्यांचं आरक्षण 60 दिवस आधीच सुरू करण्याचा निर्णय महामंडळानं घेतला आहे. यापूर्वी 30 दिवस आधी गाड्यांचं आरक्षण करण्याची मुभा होती. तर, रेल्वे गाड्यांचं आरक्षण 120 दिवस आधी करता येतं.
उत्सवकाळात गाड्यांमध्ये होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रवाशांनी आरक्षण करूनच सुखरूप प्रवास करावा, असं आवाहन एसटी महामंडळानं केलं आहे. मंडळाच्या आरक्षण केंद्रासह, अधिकृत संकेस्थळ आणि मोबाईल अॅपवरून आपण आरक्षण करू शकता.






