देशातील डॉक्टरांची संख्या रुग्णांच्या प्रमाणात कमी असल्यामुळे केंद्र सरकारने वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यास तसेच विद्यमान महाविद्यालयांमध्ये जागा वाढविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याच दृष्टीने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने दरवर्षी किमान 15,000 नवीन जागा निर्माण करण्याचे ठरवले आहे. MCC आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या सहकार्याने वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देऊन अभ्यासक्रमातील जागा वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.
advertisement
एमसीसीने 10 ऑक्टोबरला 2,650 आणि 17 ऑक्टोबरला 2,300 नवीन जागा जाहीर केल्या होत्या. या नव्या जागांमुळे देशभरातील एमबीबीएसच्या उपलब्ध जागांची संख्या आता 1,29,025 वर पोहोचली आहे. त्यामुळे तिसऱ्या फेरीपूर्वी विद्यार्थ्यांना अधिक जागा मिळणार आहेत.
महाराष्ट्रातही विद्यार्थ्यांसाठी मोठा फायदा झाला आहे. पनवेलमधील महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालयात 100 आणि मालती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजमध्ये 5 जागांना मान्यता मिळाली आहे. याआधी नागपूरमधील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात 100 आणि सोलापूरमधील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 50 जागांना मान्यता मिळाली होती. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या फेरीमध्ये एकूण 300 जागा उपलब्ध होतील.
गेल्या वर्षभरात राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने (NMC)41 नव्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिल्यामुळे देशभरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 816 वर पोहोचली आहे. यंदा नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी 170 अर्ज आले होते, ज्यात 41 सरकारी आणि 129 खासगी महाविद्यालयांसाठी होते. त्यातून मिळालेल्या 10,60 नव्या जागांमुळे देशभरातील एमबीबीएससाठी उपलब्ध एकूण जागा आता 1,37,600 वर पोहोचल्या आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2024 च्या स्वातंत्र्यदिनी देशभरात वैद्यकीय शिक्षणासाठी 75 हजार नव्या जागा उपलब्ध करण्याचे सूचित केले होते. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग आणि MCCच्या या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना एमबीबीएस प्रवेशासाठी अधिक संधी उपलब्ध होणार आहेत तसेच देशातील डॉक्टरांची संख्या वाढविण्यातही मोठा हातभार लागणार आहे.