मुंबईतील तापमानाचे धक्कादायक अंतर
‘रेस्पिरर लिविंग सायन्सेस’च्या अहवालानुसार, शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तापमानामध्ये लक्षणीय फरक दिसून येत आहे. १ मार्च ते २२ मार्चदरम्यान, वसई पश्चिमेत ३३.५°C आणि घाटकोपरमध्ये ३३.३°C तापमानाची नोंद झाली. याउलट कमी विकसित आणि हरित क्षेत्र असलेल्या पवईत तापमान केवळ २०.४°C इतके राहिले. म्हणजेच एका शहरातच तब्बल १३.१ अंश सेल्सियसचा फरक आढळून आला.
advertisement
मुंबईतील ‘हिट आयलंड’चा धोका वाढतोय
या अभ्यासाचा मुख्य उद्देश म्हणजे तापमानातील वाढती असमानता समजून घेणे आणि त्यावर योग्य उपाययोजना आखण्याचा होता. ‘रेस्पिरर लिविंग सायन्सेस’चे संस्थापक आणि सीईओ रोनक सुतारिया यांच्या मते, शहरात जलद गतीने 'हिट आयलंड' म्हणजेच उष्णतेचे छोटे छोटे केंद्र निर्माण होत आहेत.
तापमानातील हा मोठा फरक केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नाही, तर तो लोकांच्या आरोग्यावरही परिणाम करत आहे. विशेषतः दाट वस्ती असलेल्या, कमी हरित क्षेत्र असलेल्या भागांत नागरिकांना जास्त उष्णतेचा त्रास होत आहे. या भागांमध्ये हवेचे योग्य प्रमाणात वहन होत नसल्याने आणि उंच इमारती वाढल्याने समस्या वाढत आहे, असे रोनक सुतारिया यांनी सांगितले.
कोणत्या भागांत जास्त उष्णता?
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) च्या २२ केंद्रांकडून गोळा केलेल्या माहितीनुसार:
सर्वाधिक गरम भाग:
वसई पश्चिम - ३३.५°C
घाटकोपर - ३३.३°C
कोलाबा - ३२.४°C
थंड भाग:
पवई - २०.४°C
चकाला (अंधेरी पूर्व) - २३.४°C
चेंबूर - २५.५°C
आरोग्यावर गंभीर परिणाम
या अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे की, अशा तापमानातील तफावतीमुळे विशेषतः वयोवृद्ध, लहान मुले आणि शारीरिकदृष्ट्या कमजोर लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. उष्णतेमुळे उष्माघात (हीटस्ट्रोक), निर्जलीकरण (डिहायड्रेशन) आणि हृदयविकाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
तापमान नियंत्रणासाठी उपाययोजना आवश्यक
सुतारिया यांनी सुचवले की, शहरातील वाढत्या उष्णतेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक स्तरावर उपाययोजना आखणे अत्यावश्यक आहे. यासाठी...
-हरित क्षेत्रांचे जतन व वाढ: जास्त झाडे लावण्यावर भर देणे
- रिफ्लेक्टिव्ह इमारतींचे बांधकाम: ज्या इमारती उन्हाचे किरण परावर्तित करू शकतील अशा तंत्रज्ञानाचा वापर
- गर्दीच्या भागांत योग्य वायुवीजन (व्हेंटिलेशन) व्यवस्था: उष्णतेच्या लहरी टाळण्यासाठी इमारतींच्या रचनेत बदल
मुंबईच्या भविष्यासाठी..
तज्ज्ञांच्या मते, मुंबईला एकसंध तापमानाचा प्रदेश म्हणून न पाहता, विविध भागांतील तापमानाचा स्वतंत्र विचार करून धोरण आखले पाहिजे. अन्यथा वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्य आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
