कुठे घडली ही घटना?
शुक्रवारी रतलाममध्ये आयोजित 'राईज-2025' या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या आगमनाची तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली. मात्र ते या कार्यक्रमासाठी पोहोचू शकले नाहीत, त्यांच्या येण्यापूर्वीच एक मोठी गडबड समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील डिझेल भरलेल्या गाड्या काही अंतरावरच बंद पडल्याने खळबळ उडाली. तपासल्यानंतर डिझेलमध्ये पाणी भरल्याचं समोर आलं, त्यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत पेट्रोल पंप सील केला.
advertisement
19 इनोव्हा गाड्यांचा ताफा अडकला
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचा ताफा गुरुवारी रात्री इंदूरहून रतलामकडे रवाना झाला होता. या ताफ्यात एकूण 19 इनोव्हा गाड्यांचा समावेश होता. या सर्व गाड्या डोसीगाव इथल्या भारत पेट्रोलियमच्या 'शक्ती फ्यूल्स' पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी थांबल्या होत्या. डिझेल भरल्यानंतर गाड्या थोड्याच दूर गेल्या असता, एक-एक करून त्या बंद पडू लागल्या.
गाड्या बंद पडल्याने गोंधळ
गाड्या अचानक बंद पडल्यामुळे ताफ्यात एकच गोंधळ उडाला. कशाबशा गाड्यांना ढकलून रस्त्याच्या कडेला लावण्यात आले. माहिती मिळताच नायब तहसीलदार आशिष उपाध्याय आणि अन्न व पुरवठा अधिकारी यांच्यासह अनेक अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गाड्यांचे डिझेल टँक उघडून तपासले असता, 20 लीटर डिझेलपैकी जवळपास 10 लीटर पाणीच असल्याचे निष्पन्न झाले. ताफ्यातील सर्वच गाड्यांची अशीच अवस्था होती.
ट्रकही बंद पडला
याच पेट्रोल पंपावरून एका ट्रकमध्येही सुमारे 200 लीटर डिझेल भरण्यात आले होते. तो ट्रकही काही अंतरावर जाऊन बंद पडला. अधिकाऱ्यांनी तात्काळ भारत पेट्रोलियमच्या एरिया मॅनेजरला बोलावून घेतले. एरिया मॅनेजरने पावसाळ्यामुळे टाकीत पाणी झिरपण्याची शक्यता व्यक्त केली.
रात्री उशिरापर्यंत अधिकाऱ्यांचा तळ
अधिकारी रात्री सुमारे एक वाजेपर्यंत पेट्रोल पंपावरच तळ ठोकून होते. अन्न व पुरवठा विभागाने तातडीने संबंधित पेट्रोल पंप सील केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात वेळेवर पोहोचता यावे यासाठी, इंदूरहून तातडीने दुसऱ्या गाड्या मागवण्यात आल्या.