केंद्रात युपीए आघाडीचं सरकार असताना ग्रामीण भागातील नागरिकांना वर्षातील १०० दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यासाठी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. या योजनेला महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना असं नाव देण्यात आलं होतं. आता, याच मनरेगाच्या योजनेचं नाव बदलण्यात येणार असल्याचे समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये या योजनेचं नाव पूज्य बापू असं नामकरण करण्यात असल्याची चर्चा होती.
advertisement
मनरेगाचं नवं नाव काय?
समोर आलेल्या माहितीनुसार, 'मनरेगा' या योजनेचं नाव हे ‘विकसित भारत जी राम जी’ असं करण्यात येणार आहे. त्यासाठी नवं विधेयक संसदेत मांडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संभाव्य निर्णयामुळे देशाच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण रोजगार, पायाभूत सुविधा विकास आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला नव्या स्वरूपात पुढे नेण्यासाठी सरकार हा बदल करत आहे. ‘विकसित भारत’ ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी संकल्पना असून, २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने विविध योजनांमध्ये बदल केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मनरेगाचे पुनर्ब्रँडिंग करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
मनरेगा योजना २००५ साली सुरू करण्यात आली होती. ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करणे, स्थलांतर रोखणे आणि किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सध्या देशातील कोट्यवधी कुटुंबे या योजनेवर अवलंबून आहेत. त्यामुळे नावबदलासोबतच योजनेच्या रचनेत, उद्दिष्टांमध्ये किंवा अंमलबजावणीत बदल होणार का, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.
