हो, तुम्ही बरोबर वाचलंत! दरवर्षी आपण प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिन साजरा करतो, पण या दोन्ही दिवशी राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियम आणि त्यामागील अर्थ पूर्णपणे वेगळे आहेत. 2026 मध्ये देश आपला 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना, यातील रंजक आणि तांत्रिक फरक जाणून घेणे प्रत्येक भारतीयासाठी गरजेचे आहे.
ध्वजारोहण (Hoisting) आणि ध्वज फडकवणे (Unfurling)
advertisement
अनेकांना वाटतं की झेंडा फडकवणं दोन्ही दिवशी एकच प्रक्रिया. पण असं नाही यात मोठा घटनात्मक फरक आहे:
15 ऑगस्ट (ध्वजारोहण - Flag Hoisting):
स्वातंत्र्यदिनी तिरंगा खांबाच्या खाली बांधलेला असतो. दोरीच्या सहाय्याने तो खालून वर नेला जातो आणि मग फडकवला जातो. या प्रक्रियेला 'ध्वजारोहण' म्हणतात. हे ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवून भारताचा तिरंगा वर चढवण्याचे आणि एका नव्या स्वतंत्र राष्ट्राच्या उदयाचे प्रतीक आहे.
26 जानेवारी (ध्वज फडकवणे - Flag Unfurling):
प्रजासत्ताक दिनी तिरंगा आधीच खांबाच्या वरच्या टोकाला बांधलेला असतो. तो केवळ दोरी ओढून उघडला जातो. याला 'ध्वज फडकवणे' म्हणतात. हे भारत आधीच स्वतंत्र असून, आता संविधानाच्या अंमलबजावणीने एका प्रजासत्ताक युगाची सुरुवात झाली असल्याचे दर्शवते.
पंतप्रधान की राष्ट्रपती? कोण फडकवतं तिरंगा?
ध्वज कोण फडकवणार, यामध्येही एक विशेष प्रोटोकॉल असतो:
स्वातंत्र्यदिन (15 ऑगस्ट):
या दिवशी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात. कारण, 1947 मध्ये जेव्हा देश स्वतंत्र झाला, तेव्हा भारताचे संविधान लागू झाले नव्हते आणि राष्ट्रपतींचे पद अस्तित्वात नव्हते. त्यावेळी पंतप्रधान हेच देशाचे प्रमुख होते.
प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी): या दिवशी देशाचे राष्ट्रपती कर्तव्य पथावर ध्वज फडकवतात. याचे कारण म्हणजे, राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख (Constitutional Head) असतात. 26 जानेवारी 1950 रोजीच भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी शपथ घेतली होती.
स्थानाचे महत्त्व
स्वातंत्र्यदिनाचा मुख्य सोहळा ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पार पडतो.
प्रजासत्ताक दिनाचा सोहळा राजधानी दिल्लीतील 'कर्तव्य पथावर' (पूर्वीचा राजपथ) भव्य परेडसह साजरा केला जातो.
26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले आणि भारत खऱ्या अर्थाने एक 'गणतंत्र' बनला. त्यामुळेच 15 ऑगस्ट हा दिवस 'मुक्ती' दर्शवतो, तर 26 जानेवारी हा दिवस आपल्या 'कायद्याचे आणि लोकशाहीचे' सामर्थ्य दर्शवतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही प्रजासत्ताक दिनाचा सोहळा टीव्हीवर पाहाल, तेव्हा या छोट्या पण महत्त्वपूर्ण गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
