रविवारी अमरपूर बस स्थानकावर प्रवाशांची नेहमीप्रमाणे वर्दळ होती. पण अचानक एका 60 वर्षांच्या महिलेला आणि 35 वर्षांच्या तरुणाला काही लोकांनी घेरलं आणि तिथेच वादावादी सुरू झाली. हे लोक दुसरे तिसरे कोणी नसून त्या महिलेचा पती आणि मुलगा होते. आपल्या बायकोला आणि आईला एका परक्या तरुणासोबत पाहून त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी त्या तरुणाला (वकील मिश्रा) पकडून बेदम चोप दिला. सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या या मारहाणीमुळे तिथे एकच गर्दी झाली आणि या 'अनोख्या' प्रेमकहाणीचा उलगडा झाला.
advertisement
पोलिस स्टेशनमध्ये गेल्यावर या प्रकरणाचा जो इतिहास समोर आला, तो एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नव्हता. सुमारे चार महिन्यांपूर्वी एका 'रॉन्ग नंबर'वरून ही कहाणी सुरू झाली. 60 वर्षांच्या या महिलेचा आणि आरा येथील वकील मिश्रा (वय 35) यांचा फोनवर संपर्क झाला. ओळखीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं. या प्रेमाची ओढ इतकी होती की, दोघांनी भागलपूर रेल्वे स्थानकावर भेटण्याचे ठरवले आणि तिथून थेट लुधियाना गाठलं.
महिलेला जेव्हा तिच्या मुलाने आणि पतीने जाब विचारला, तेव्हा तिने दिलेले उत्तर ऐकून पोलीसही अवाक झाले. "आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि लुधियानामध्ये आम्ही लग्नही केलं आहे," असा दावा महिलेने भर चौकात केला. गेल्या काही दिवसांपासून ते दोघे तिथे पती-पत्नी म्हणून राहत होते, असेही तिने सांगितले. मात्र, तिचे कुटुंब हा धक्का सहन करण्याच्या स्थितीत नाही. महिलेचा मुलगा आणि पती पोलिसांसमोर ढसाढसा रडत होते.
परिजनांच्या संतापामुळे प्रकरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून स्थानिकांनी हस्तक्षेप करत या दोघांना अमरपूर पोलीस ठाण्यात नेले. सध्या हे प्रेमी जोडपे पोलिसांच्या ताब्यात आहे. "आम्ही दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत आहोत. 60 वर्षांच्या महिलेने घर सोडल्याने कौटुंबिक वाद निर्माण झाला आहे. कायदेशीर बाबी तपासून पुढील कारवाई केली जाईल," अशी माहिती अमरपूरचे ठाणेदार पंकज कुमार झा यांनी दिली. सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
