या भीषण अपघातात एका दोन वर्षांच्या चिमुरड्याची परिस्थीती चिंताजनक आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात नक्की कसा घडला आणि त्यामागे कोणाचा निष्काळजीपणा आहे, हे धक्कादायक आहे.
नेमकं काय घडलं?
बुधवारी सकाळी 7 च्या सुमारास हावेरी येथील मध्यवर्ती बसस्थानकावर नेहमीप्रमाणे प्रवाशांची गर्दी होती. सावनूर येथील हजरत अली (वय 2) हा चिमुरडा आपल्या कुटुंबासह बसची वाट पाहत होता. इतर प्रवासीही प्लॅटफॉर्मवर उभे राहून येणाऱ्या बसचे डेस्टिनेशन बोर्ड तपासत होते. त्याच वेळी हावेरीहून लक्ष्मेश्वरकडे जाणारी एक बस अत्यंत वेगाने बसस्थानकात घुसली.
advertisement
चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस थेट प्लॅटफॉर्मवर चढली आणि तिथे उभ्या असलेल्या प्रवाशांना जोराची धडक दिली. या भीषण धडकेमुळे बसस्थानकावर एकच किंकाळ्या आणि धावपळ सुरू झाली.
या अपघातात सर्वात जास्त फटका हजरत अली या दोन वर्षांच्या बालकाला बसला आहे. त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याला तातडीने प्राथमिक उपचार देऊन हुबळी येथील KIMS रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तिथे त्याची परिस्थीती खूपच गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
इतर जखमींमध्ये वासुदेव (44), हर्षा (6) आणि काव्यांजली (39) या बांकापूर येथील रहिवाशांचा समावेश आहे. या सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बसचा वेग इतका जास्त होता की प्रवाशांना बाजूला होण्याची संधीच मिळाली नाही. अपघाताचा अंदाज येताच बस चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर हावेरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिसाांकडून चालकाचा शोध सुरू केला आहे.
हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला की बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, बसस्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी बसचा असा वेग असणे, हे प्रशासनाच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
प्रवास करताना आपण सतर्क असतोच, पण बसस्थानकासारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणीही अशा घटना घडणे भीतीदायक आहे. चालकांचा थोडासा निष्काळजीपणा निष्पाप जीवांच्या जिवावर बेतू शकतो, हेच या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलं आहे.
