ईव्हीएम खराब झाली तर काय होतं?
मतदानाच्या वेळी जर ईव्हीएम मशीन काम करेनाशी झाली, तर घाबरण्याचं कारण नाही. निवडणूक आयोगानं यासाठी पर्यायी मशीनची (बॅकअप) व्यवस्था केली आहे. मतदान केंद्रावर अतिरिक्त ईव्हीएम ठेवल्या जातात, जेणेकरून कोणतीही अडचण आली तरी मतदान थांबू नये. खराब झालेल्या मशीनपर्यंत झालेली मतनोंद सुरक्षित राहते, कारण ती कंट्रोल युनिटच्या मेमरीत साठवली जाते.
advertisement
ईव्हीएमवर कोण ठेवतं लक्ष?
मतदानाच्या दिवशी क्षेत्रीय आणि झोनल अधिकाऱ्यांकडून सतत गस्त ठेवली जाते. त्यांच्या कडे राखीव ईव्हीएमचा साठाही असतो. कुठलीही मशीन बंद पडल्यास, ती तत्काळ नव्या मशीनने बदलण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असते.
मशीन खराब होण्याची शक्यता किती?
ईव्हीएम खराब होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. कारण मतदानापूर्वी प्रत्येक मशीनची प्रथम स्तरीय तपासणी (FLC) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बेंगळुरू आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, हैदराबाद येथील अभियंत्यांद्वारे केली जाते.
वीज गेली तर मतदान थांबतं का?
नाही. ईव्हीएम मशीन बॅटरीवर चालतात. त्यामुळे वीज गेली तरी मतदानावर कोणताही परिणाम होत नाही. एका ईव्हीएममध्ये किती मतं नोंदवता येतात?
एक ईव्हीएम 2000 मतं नोंदवू शकते. तिचे दोन भाग असतात. कंट्रोल युनिट (नियंत्रण यंत्रणा) आणि वोटिंग युनिट (मतदान यंत्रणा). ही दोन्ही युनिट्स केबलने जोडलेली असतात.
मतदान झालं हे कसं कळतं?
मतदाराने आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर असलेलं बटण दाबलं की एक लाल दिवा लागतो आणि बीपचा आवाज येतो. हा आवाज म्हणजे तुमचं मतदान नोंदवलं गेलं आहे याची खात्री. याशिवाय VVPAT मशीनमधून एक पावतीसारखी स्लिप बाहेर येते, ज्यावर तुम्ही ज्या उमेदवाराला मत दिलं त्याचं नाव दिसतं.
