पाकिस्तानने एअरस्पेस नाकारले
इंडिगोच्या वैमानिकाने वादळ आणि गारपिटीपासून वाचण्यासाठी सुरुवातीला भारतीय वायुसेनेच्या अखत्यारीतील नॉर्दर्न एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क साधला. वादळापासून वाचण्यासाठी विमानाचा मार्ग बदलून पाकिस्तानच्या दिशेने जाण्याची परवानगी मागितली. त्यानंतर वैमानिकाने लाहोर एटीसीशी संपर्क साधून आपत्कालीन लँडिंगची (Emergency Landing) परवानगी मागितली. मात्र डीजीसीए (DGCA) च्या निवेदनानुसार इंडिगो फ्लाइटच्या वैमानिकाच्या या दोन्ही विनंत्या नाकारण्यात आल्या. यामुळे वैमानिकाला वादळ आणि गारपिटीतूनच विमान श्रीनगरकडे न्यावे लागले आणि तिथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
advertisement
अराजकतेची भविष्यवाणी खरी होतेय, जगाची धाकधूक वाढली; पुस्तकातील एक-एक शब्द खरा
21 मे रोजी संध्याकाळी 6.30 वाजता हे विमान श्रीनगर विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण 227 लोक होते. ज्यात तृणमूल काँग्रेसचे 5 खासदारही समाविष्ट होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये A321 निओ विमान वादळात कसे हेलकावे खात होते, हे स्पष्टपणे दिसत आहे.
उत्तर भारतात तांडव
21 मे रोजी संध्याकाळी उत्तर भारतातील हवामान अचानक बिघडले. 70 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहू लागले. गारपीट झाली आणि मुसळधार पाऊस पडला. या वादळामुळे संबंधित घटनांमध्ये 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. विमानात बसलेल्या प्रवाशांच्या विशेषतः लहान मुलांच्या आणि महिलांच्या भीतीने ओरडण्याचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.
वैमानिकाची अविश्वसनीय कामगिरी
डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार विमान पंजाबमधील पठाणकोटजवळ सुमारे 36,000 फूट उंचीवर उडत असताना ते अचानक वादळ आणि गारपिटीच्या कचाट्यात सापडले. विमानात प्रचंड उलथापालथ झाल्याने क्रूने सुरुवातीला नॉर्दर्न एटीसीला विनंती केली की, विमान आंतरराष्ट्रीय सीमेकडे वळवावे. जिथे नुकतेच ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये तीव्र संघर्ष झाला होता. हे एअर ट्रॅफिक कंट्रोल भारतीय वायुसेनेच्या अखत्यारीत येते. मात्र वैमानिकाची ही विनंती नाकारण्यात आली.
यानंतर वैमानिकाने लाहोर एटीसीला वादळापासून वाचण्यासाठी काही काळ पाकिस्तानी हवाई क्षेत्रात जाण्याची परवानगी मागितली. परंतु पाकिस्ताननेही परवानगी नाकारली. मर्यादित पर्याय असल्याने वैमानिकाने सुरुवातीला दिल्लीला परतण्याचा विचार केला. तथापि वादळी ढग विमानाजवळ असल्याने परत फिरणे सुरक्षित नव्हते.
त्यामुळे वैमानिकाने वादळाच्या मधूनच श्रीनगरच्या दिशेने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. कारण तोच सर्वात जवळचा मार्ग होता. वादळापासून वाचण्याचा प्रयत्न करत असताना विमानाला हवेच्या तीव्र झोक्यांचा सामना करावा लागला. ज्यामुळे ते वेगाने वर-खाली होऊ लागले. यामुळे ऑटोपायलट मोड बंद पडला आणि विमानाचा वेग कमी-जास्त होऊ लागला. डीजीसीएने म्हटले आहे की, वादळी ढगांतून जात असताना, विमानाच्या अँगल ऑफ अटॅक फॉल्टमध्ये बिघाड झाला. अल्टरनेट लॉ प्रोटेक्शन निकामी झाले आणि विमान एअरस्पीड इंडिकेशन अलर्ट देऊ लागले.
पायलटच्या प्रसंगावधानामुळे २२७ जीव वाचले
एका क्षणी विमानाची लँडिंग स्पीड 8,500 फूट प्रति मिनिटांपर्यंत पोहोचली होती. या महत्त्वाच्या टप्प्यावर वैमानिकाने गारपीटीतून बाहेर पडेपर्यंत विमानाचे नियंत्रण स्वतःच्या हातात घेतले (मॅन्युअल कंट्रोल). वैमानिकाने श्रीनगर एटीसीला आपत्कालीन लँडिंगचा अलर्ट पाठवला. त्यानंतर रडार वेक्टर सक्रिय झाले. शेवटी विमान श्रीनगरमध्ये सुरक्षितपणे उतरले आणि कोणत्याही प्रवाशाला किंवा चालक दलाच्या सदस्याला कोणतीही दुखापत झाली नाही. डीजीसीएने सांगितले की, लँडिंग दरम्यान ऑटो थ्रस्ट सिस्टिम सामान्यपणे काम करत होती. या घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.