जमिनीची रचना बिघडल्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता घटते. परिणामी जमीन कडक, चोपण किंवा क्षारीय बनते. अशा जमिनीत मुळांची योग्य वाढ होत नाही. तसेच रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पीएच असंतुलित होतो. पीएच बदलल्याने लोह, जस्त, तांबे यांसारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध राहत नाहीत. याचा थेट परिणाम पिकांच्या वाढीवर, उत्पादनाच्या प्रमाणावर आणि गुणवत्तेवर होतो.
advertisement
Success Story : आई-वडील ऊसतोड कामगार, शिक्षण घेतं केली कांदा शेती, प्रवीणने मिळवला 4 लाख निव्वळ नफा
रासायनिक खतांचा अतिरेक जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांसाठीही घातक ठरतो. हे सूक्ष्मजीव जमिनीला जिवंत ठेवण्याचे महत्त्वाचे काम करतात. मात्र जास्त प्रमाणातील रसायने या जिवंत घटकांचा नाश करतात. त्यामुळे जमिनीची नैसर्गिक ताकद कमी होत जाते आणि शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात अधिक प्रमाणात खतांचा वापर करावा लागतो. हा एक दुष्टचक्राचा भाग बनतो, ज्यातून बाहेर पडणे कठीण होते.
यासोबतच रासायनिक खतांचा अतिवापर पर्यावरणासाठीही मोठा धोका निर्माण करतो. पावसाच्या पाण्यासोबत अतिरिक्त खत वाहून जाऊन नद्या, तलाव आणि भूजल प्रदूषित होते. यामुळे पाण्याची गुणवत्ता घसरते आणि मानवी आरोग्यावरही परिणाम होतो. नायट्रोजनयुक्त खतांचा अतिरेक झाल्यास पिकांची वाढ अनैसर्गिक होते, झाडे कमकुवत बनतात आणि कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. जमिनीतील मिठाचे प्रमाण वाढल्याने काही जमिनी कायमस्वरूपी नापीक होण्याचा धोका निर्माण होतो.
या गंभीर समस्यांवर उपाय म्हणून तज्ज्ञ संतुलित खत व्यवस्थापनाचा सल्ला देत आहेत. मृदा परीक्षणावर आधारित खत वापर, शेणखत, कंपोस्ट, हिरवळीचे खत आणि जैविक खतांचा समावेश केल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहू शकते. रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा योग्य समतोल राखल्यास उत्पादन स्थिर राहते, खर्च कमी होतो आणि शाश्वत शेती शक्य होते. जमिनीचे आरोग्य जपणे हीच भविष्यातील समृद्ध शेतीची गुरुकिल्ली आहे.





