राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातून जोधपूरकडे जाणाऱ्या एका एसी स्लीपर बसला मंगळवारी दुपारी ३:३० वाजता जैसलमेर-जोधपूर महामार्गावर भीषण आग लागली. या अपघातात २० हून अधिक प्रवाशांचा होपळून मृत्यू झाला. बसचा दरवाजा लॉक झाल्याने आत अडकलेले प्रवासी जिवंत जळाले. अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेले जैसलमेरचे रहिवासी आणि दारूचे ठेकेदार कस्तूर सिंह यांनी डोळ्यांदेखत घडलेला थरार सांगितला.
advertisement
प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार, आर्मीनं कसं वाचवलं?
कस्तूर म्हणाले, "बसला आग लागताच आत खळबळ माजली. बसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. काही प्रवासी खिडक्यांमधून उड्या मारून पळाले, पण अनेक जण आतच अडकले. आग इतकी प्रचंड होती की, आम्ही जवळ जाऊनही काही करू शकलो नाही." कस्तूर सिंह यांनी पुढे सांगितले की, घटनेनंतर तातडीने सैन्याला माहिती दिली. आर्मीचे जवान जेसीबी घेऊन आले आणि त्यांनी बसचा गेट तोडलं. त्यानंतर काही प्रवाशांना बाहेर काढता आले. पण हे दृश्य खूपच भयानक होते, बसमध्ये अनेक लोक जिवंत जळाले," असे त्यांनी सांगितले.
५ दिवस जुनी बस, फायर सेफ्टीची कमी
कस्तूर यांनी जवळ असलेल्या पाणी टँकरने आणि आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. अग्निशमन दलाला बोलावले होते, पण ४५ मिनिटे होऊनही मदत मिळाली नाही. 'के के ट्रॅव्हल्स'ची ही बस फक्त ५ दिवसांपूर्वीच या मार्गावर सुरू करण्यात आली होती. एका सामान्य बसला एसी स्लीपरमध्ये मॉडिफाय करण्यात आले होते. बसमध्ये फायर सेफ्टी उपकरणे उपलब्ध नव्हते. प्रारंभिक तपासात आग लागण्याचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे समोर आले आहे. बसची फायबर बॉडी आणि काचेच्या खिडक्यांमुळे आग वेगाने पसरली आणि प्रवाशांसाठी ती मृत्यूचा सापळा ठरली.
अपघाताच्या वेळी बसमध्ये ५७ प्रवासी होते. स्थानिक लोक आणि सैन्याच्या मदतीने ८ वर्षांच्या लहान मुलापासून ते ७९ वर्षांच्या वृद्धांपर्यंत १६ प्रवाशांनाच वाचवता आले. गंभीर जखमींना तातडीने जोधपूरच्या महात्मा गांधी हॉस्पिटल आणि मथुरादास माथुर हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे प्रवासी सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.