जैसलमेर इथे झालेल्या बस अग्निकांड प्रकरणात भारतीय सैन्यदलाचे जवान, त्यांची पत्नी आणि तीन मुलांचा मृत्यू झाला. आगीत होरपळल्याने अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. आईकडे दिवाळीनिमित्त निघालेल्या कुटुंबाचा दुर्घटनेत दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आईवर दु:खाचा डोंगर कोसळला, मुलगा, सून आणि नातवंड पुन्हा कधीच परत येणार नाहीत, या विचारांनी आभाळ कोसळल्यासारखं झालं. जैसलमेर-जोधपूर महामार्गावर झालेल्या बस दुर्घटनेतील महेंद्र मेघवाल यांच्या कुटुंबाची ही कहाणी काळजाला पीळ पाडणारी आहे.
advertisement
आईवर कोसळला दु:खाचा डोंगर
महेंद्र हे जैसलमेरमधील आर्मी डेपोमध्ये तैनात होते. दिवाळीची सुट्टी साजरी करण्यासाठी ते मोठ्या आनंदाने आपल्या घरी, जोधपूरजवळच्या डेचू गावाकडे निघाले होते. घरी त्यांची आई, नातवंडे आणि मुलाची वाट पाहत होत्या. महेंद्र आणि त्यांची पत्नी पार्वती यांनी दिवाळीची अनेक स्वप्ने पाहिली असतील, पण बस दुर्घटनेत सगळंच बेचिराख झालं. या अपघातात महेंद्र, त्यांची पत्नी पार्वती, दोन मुली खुशबू आणि दीक्षा आणि एक लहान मुलगा शौर्य या संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला.
जोधपूरपासून १०० किलोमीटर दूर असलेल्या डेचू गावात महेंद्रची वृद्ध आई अजूनही मुलाची आणि नातवंडांची वाट पाहत असेल, पण त्यांची ही प्रतीक्षा कधीही संपणार नाही. या अपघाताने एका क्षणात त्या आईचा आधार हिरावून घेतला. अवघ्या 10 मिनिटांत आगीनं रौद्र रुप धारण केल्यामुळे बसचा दरवाजा लॉक झाला. त्यामुळे खिडकीतून अनेकांनी उड्या मारल्या. संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी होती.
जेसीबीने दरवाजा कापून काढावा लागला. आग इतकी भीषण होती की बसमध्ये जाण्यासाठी देखील चार तास थांबावं लागलं इतकी उष्णता त्या बसमध्ये होती. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी DNA टेस्ट केल्या जात आहेत. या दुर्घटनेत 20 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 16 प्रवासी गंभीररित्या होरपळले आहेत. त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
डीएनए चाचणीची तयारी
या असह्य दुःखाचा डोंगर महेंद्रच्या आईवर कोसळला आहे. पोलीस महेंद्रच्या वृद्ध आईला जोधपूरला आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जर त्यांना प्रवासात अडचण आली, तर डॉक्टरांची टीम थेट त्यांच्या घरी पाठवून डीएनए चाचणीसाठी नमुने गोळा केले जातील. एका मनहूस बसने एका क्षणात एका घराच्या सर्व खुश्या हिरावून घेतल्या आणि दिवाळीचा सण संपूर्ण कुटुंबासाठी मातमात बदलला आहे. या दुर्घटनेत महेंद्रच्या कुटुंबासह एकूण २० लोकांचा मृत्यू झाला आहे.