केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या कम्युनिस्ट सरकारच्या या प्रस्तावाला मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. केरळचं नाव 'केरळम' करण्याचा निर्णय नव्या पीएमओमध्ये झालेल्या पहिल्या बैठकीत घेण्यात आला. केंद्र सरकारने राज्य सरकारच्या या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला आहे, ज्यात संविधानाच्या पहिल्या अनुसूचीसह सर्व अधिकृत भाषांमध्ये राज्याचं नाव 'केरळम' करावं अशी मागणी होती. डाव्या सरकारचा प्रस्ताव केंद्राने इतक्या पटकन का मंजूर केला याचीच सर्वाधिक चर्चा आहे. विशेष म्हणजे, केरळमध्ये एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून भाजप केरळमध्ये आपलं राजकीय स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. दक्षिण भारतात आपली पकड वाढवण्यासाठी केरळ भाजपसाठी खूप महत्त्वाचं राज्य आहे.
advertisement
केरळमला हिरवा कंदील देण्याचं कारण काय?
केरळचे लोक 'मल्याळम' भाषेला आणि संस्कृतीला खूप जपतात हे सर्वश्रूत आहे. जर केंद्र सरकारने हा प्रस्ताव नाकारला असता किंवा प्रलंबित ठेवला असता, तर डाव्या आघाडी (LDF) आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी (UDF) यांनी हा मुद्दा आगामी निवडणुकीत मोठा केला असता. केंद्र सरकार केरळच्या भाषा आणि संस्कृतीचा आदर करत नाही, असा मेसेज याातून गेला असता. त्यामुळे केंद्राने हा प्रस्ताव लगेच मंजूर करून विरोधकांच्या हातात आयत कोळीत देण्याची संधी दिली नाही. केरळ विधानसभेनं 24 जून 2024 रोजी हा प्रस्ताव एकमताने मंजूर केला होता. म्हणजेच सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी (LDF) आणि विरोधी काँग्रेस (UDF) दोघेही एकत्र होते. जेव्हा एखाद्या राज्याची संपूर्ण विधानसभा एकत्रितपणे मागणी करते, तेव्हा केंद्र सरकारसाठी ती दीर्घकाळ दुर्लक्षित करणं कठीण होतं.
'केरळम' या शब्दाचा खरा अर्थ काय?
मल्याळम भाषा बोलणारे लोक नेहमीच त्यांच्या राज्याला 'केरळम' म्हणतात. हे नाव नवीन नाही, तर हे या भूमीचं मूळ नाव आहे. या नावामागे दोन मुख्य मते आहेत.
1. केरळ म्हणजे 'नारळाची भूमी' - मल्याळममध्ये 'केरा' म्हणजे नारळाचं झाड आणि 'अलम' म्हणजे जमीन किंवा भूमी. केरळमध्ये नारळाची झाडं भरपूर आहेत, म्हणून 'केरा' आणि 'अलम' मिळून (केरलम) 'केरळम' झालं, ज्याचा अर्थ 'नारळाच्या झाडांची भूमी' असा होतो. हे राज्याच्या भौगोलिक ओळखीला पूर्णपणे लागू पडतं.
2. 'चेर राजवंश' पासून उत्पत्ती - काही इतिहासकार मानतात की, हे नाव प्राचीन 'चेर' राजवंशावरून आलं आहे. प्राचीन काळात या भागावर चेर राजे राज्य करत होते. अशोकाच्या शिलालेखातही 'चेरापुत्र' असा उल्लेख आहे. 'चेरम' हा शब्दच पुढे भाषेच्या बदलामुळे 'केरळम' झाला.
मग नाव 'केरळ' कसं पडलं?
जर मूळ नाव 'केरळम' होतं, तर सरकारी कागदपत्रांमध्ये ते 'केरळ' कसं झालं? याचं मूळ भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि राज्यांच्या पुनर्रचनेत आहे. 1 नोव्हेंबर 1956 रोजी 'राज्य पुनर्रचना कायदा'नुसार भाषेच्या आधारावर राज्यं बनवली गेली, तेव्हा मल्याळम बोलणारे मालाबार, कोचीन आणि त्रावणकोर एकत्र करून नवीन राज्य बनवलं. संविधान तयार करणाऱ्यांनी आणि इंग्रजी जाणणाऱ्या अधिकाऱ्यांनी याचं इंग्रजीत 'Kerala' असं रूपांतर केलं. उत्तर भारतात आणि हिंदी पट्ट्यातही 'केरळ' असं नाव पडलं. जरी संविधानाच्या आठव्या अनुसूचीत मान्यताप्राप्त भाषा 'मल्याळम' आहे, तरी राज्याचं नाव 'केरळ' असं लिहिलं गेलं. राज्यातील लोकांना हे नेहमीच खटकत होतं की, जेव्हा ते स्वतःच्या भाषेत 'केरळम' म्हणतात, तेव्हा सरकारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या राज्याचं नाव अपूर्ण का आहे असा सवाल उपस्थितीत केला जात होता, अखेरीस आता केरळ राज्याचं नाव बदलण्यात आालं आहे.
