दुचाकीच्या धडकेनंतर आग भडकली
कुरनूलचे पोलीस अधीक्षक विक्रांत पाटील यांनी या दुर्घटनेची माहिती दिली. " पहाटे ३ वाजता कावेरी ट्रॅव्हल्सची व्होल्वो बस हैदराबादहून बंगळूरकडे जात होती. त्याचवेळी बसची एका दुचाकीसोबत टक्कर झाली. ती दुचाकी बसच्या खाली अडकल्यामुळे घर्षणातून ठिणगी उडाली आणि बसने क्षणार्धात पेट घेतला," अशी माहिती त्यांनी दिली. आग लागल्यानंतर एसी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना खिडक्या तोडून बाहेर पडावे लागले. पाटील यांनी सांगितले की, "जे प्रवासी खिडक्या तोडून बाहेर पडू शकले, ते सुरक्षित आहेत."
advertisement
एसी बसमध्ये 42 प्रवासी होते
या बसमध्ये दोन ड्रायव्हर्ससह एकूण ४० लोक प्रवास करत होते. अपघातानंतर बसमधील 20 प्रवाशांचा मृत्यू झाला. याशिवाय, १५ लोकांना वाचवण्यात यश आले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ११ जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर इतर तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आग विझवण्यात यश आले असून, बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंकडून दु:ख व्यक्त
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या भीषण बस दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी 'एक्स'वर (माजी ट्विटर) पोस्ट करत म्हटले, "कुरनूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुर गावाजवळ घडलेल्या बस अपघाताबद्दल ऐकून मला खूप दुःख झाले आहे. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे." नायडू यांनी सरकारी अधिकाऱ्यांनी जखमींना आणि पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपी अध्यक्ष वायएस जगन मोहन रेड्डी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
राजस्थानातील बस अपघाताची आठवण
८ दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये खासगी बसला आग लागून 20 प्रवासी होरपळले होते. आगीचा भडका उडाल्याने दरवाजा लॉक झाला आणि त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आलं नव्हतं. त्यामुळे प्रवाशांचा होपळून मृत्यू झाला होता. पुन्हा एकदा या दुर्घटनेची पुनरावृत्ती आंध्र प्रदेशमध्ये झाल्याने खळबळ उडाली आहे. खासगी बसने प्रवास करणाऱ्यांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण आहे.
